नेत्यांच्या सुरक्षेत कपात, आता वातावरण तापलं; भाजप, मनसे नेते काय म्हणाले?

| Updated on: Jan 10, 2021 | 2:52 PM

भाजप आणि मनसे नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर आता सरकारला लक्ष्य केलं जात आहे. मनसेनं हे सरकार कोत्या मनाचं असल्याचे म्हणत बोचरी टीका केलीये. (BJP MNS security reduction)

नेत्यांच्या सुरक्षेत कपात, आता वातावरण तापलं; भाजप, मनसे नेते काय म्हणाले?
Follow us on

मुंबई : राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते आशिष शेलार, भाजप आमदार प्रसाद लाड, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर निर्णयानंतर विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. मनसेनं हे सरकार कोत्या मनाचं असल्याचे म्हणत बोचरी टीका केलीये. तर सरकारने राज्याच्या जनतेची सुरक्षा केली तरी ते आमच्यासाठी पुरे असल्याचं सांगत भाजपने सरकारला धारेवर धरलंय. (BJP and MNS criticises the Maharashtra government on security reduction of leaders)

आम्ही स्व:त राज यांना सुरक्षा पुरवू : राजू पाटील

“देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यांची झेड सिक्युरिटी काढली. मात्र सुरक्षा काढली जरी असली तरी त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. ठाकरे सरकार हे जाणीवपूर्वक राजकारण करतंय,” असं म्हणत राजू पाटील यांनी सरकारवर ताशेरे ओढले. तसेच, राज ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे, असे म्हणत राज ठाकरे यांना मनसे सैनिक सुरक्षा पुरवतील असे ठणकावून सांगितले आहे.

आम्हाला आमची चिंता नाही, तुम्ही राज्याच्या जनतेची काळजी घ्या : प्रविण दरेकर

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, आशिष शेलार या भाजप नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर भाजपने सरकारवर सडकून टीका केली आहे. आम्हाला आमच्या सुरक्षेची चिंता नाही. मात्र, सरकारने राज्यातील जनतेच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. सरकारने एवढे केले तरी आमच्यासाठी पुरे आहे, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. तसेच, फडणवीस यांची सुरक्षा वाढविण्याची गरज असल्याचा अहवाल पोलिसांनी दिलेला आहे. मात्र, सरकाराने सुरक्षा काढून घेतली. समितीच्या अहवालावरून निर्णय घेतला जातो. पण इथे राजकीय निर्णय घेतला जात आहे, असे म्हणत दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हा निर्णय सूडबुद्धीने घेतलेला : केशव उपाध्ये

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीने घेतलेला आहे. हा निर्णय राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

“महाविकास आघाडी सरकारने या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. कोरोना काळात आणि त्याआधीही देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून जनतेला दिलासा देण्याचे काम करत होते. त्या काळात मुख्यमंत्री घरात बसून होते. भंडारा येथेही फडणवीस हेच सर्वप्रथम धावून गेले. असे असतानाही राज्य सरकारने या नेत्यांची पूर्ण सुरक्षा काढून घेतली असे केशव उपाध्ये म्हणाले. तसेच, सुरक्षा काढली तरी ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम करतच राहतील असे म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

संबंधित बातम्या :

फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; जाणून घ्या Z+, Y सुरक्षा व्यवस्था काय असते? कुणाला दिली जाते?

राणे, चंद्रकांतदादांची वाय प्लस सुरक्षा रद्द; आठवलेंना एस्कॉर्टशिवाय वायप्लस सुरक्षा

सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पलटवार

(BJP and MNS criticises the Maharashtra government on security reduction of leaders)