भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल

उद्याची निवडणूक वातावरणावर जिंकायची नाही. मला खरं खोटं करून जिंकायची आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा. या सरकारच्या योजना कशा फसव्या आहेत. हे लोकांना जाऊन सांगा. त्यांना माहिती द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2023 | 1:25 PM

अमरावती : मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असं रामदास स्वामी म्हणायचे. पण भाजपचं वेगळंच आहे. भ्रष्ट तितुका मेळावावा, भाजप पक्ष वाढवावा, असं भाजपचं सुरू आहे. कुणाच्या कार्याच्या कर्तृत्वाचं काही नाही. कुत्रं पकडण्याची गाडी असते. दिसला कुत्रा तर पकडला जातो. तसं दिसला भ्रष्टाचारी की टाकला गाडीत, असं आज सुरू आहे. नंतर वॉशिंग मशीनमध्ये टाकलं जातं. मला भाजपची चिंता नाहीये. माझं सर्व काढून घेतलं. तरीही त्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटते. माझ्याकडे काही नाही. पक्ष नाही, चिन्ह नाही. सर्व तुम्हाला दिलं. तरी तुम्हाला माझी भीती का वाटते. माझ्याकडे काही नाही, पण कार्यकर्ते सोबत आहे. हीच माझी ताकद आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. पंतप्रधानांनी चाय पे चर्चा सुरू केली होती. त्या चहात साखर किती होती माहीत नाही. पण तुम्ही आता पारावर, चावडीवर, चहाच्या टपरीवर, पानाच्या टपरीवर, गावागावात, एसटी स्टँडवर कुठेही जा, तिथे चर्चा करा. सरकारच्या योजना किती फसव्या आहेत याची चर्चा करा. लोकांना सांगा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

ज्यांना जायचं त्यांनी जा

सर्वांना एक दिवस जावेच लागणार आहे. पण पाठी काय पाऊलखुणा ठेवणार? ज्या पाऊलखुणा टाकता ते वाईट आहे. पूर्वी मतपेटीतून सरकार यायचं आता खोक्यातून येतं. उद्या दाऊद येऊन पैशाच्या जोरावर सरकार स्थापन करेल. पंतप्रधान बसवतील. हा पायंडा मोडायचा आहे, असं आवाहन त्यांनी केलं. जमीन माझी आहे. गद्दारीचं तण उपटून टाका. ज्यांना जायचं त्यांनी जा. गंगा मलीन केली, तशी शिवसेना मलीन करायची नाहीये, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

त्रिशूळाची तीन टोकं बोचतील

त्रिशूळाला तीन टोकं आहेत. खोटं बोलाल तर त्रिशूळाची तीन टोकं बोचतील. तुमची आज तीन तोंडं झाली. उद्या चार होतील. पण एकच रामबाण खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच भाजपचं हिंदुत्व हे मुँह में राम बगल में छुरी असंच आहे, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us