आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही, तुम्ही कोण आहात? भाजपचा संजय राऊतांवर पलटवार

| Updated on: Nov 26, 2020 | 4:57 PM

मुख्यमंत्र्यांनी दमबाजीची भाषा करणे गैर तर आहेच, पण 100 टक्के घटनाविरोधी आहे" असंही भातखळकर म्हणाले.

आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही, तुम्ही कोण आहात? भाजपचा संजय राऊतांवर पलटवार
Follow us on

मुंबई : “शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्हाला दम दिला. आम्ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना ऐकलं नाही तर तुम्ही कोण आहात?” असा सवाल करत भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. (BJP Leader Atul Bhatkhalkar slams Shivsena MP Sanjay Raut for intimidating)

“संजय राऊत यांनी आम्हाला दम दिला. त्यांना आम्हाला सांगायचं आहे की असे दम-बिम देण्याची भाषा करु नका. ही भाजप आहे. आम्ही इंदिरा गांधींना ऐकलं नाही, तर तुम्ही कोण आहात. सर्व राज्य एका कुटुंबासाठी चालवलं जात आहे. तुम्ही कितीही दबाव आणला, तरी ही भाजप जनतेचा आवाज बुलंद करेल” असा इशारा भातखळकरांनी दिला. संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या 100-120 जणांची यादी केंद्र आणि ईडीकडे पाठवण्याचा इशारा दिला होता.

“महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी दमबाजीची भाषा करतात. आम्ही तुमच्या अंगावर येऊ, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत, असं मुख्यमंत्री म्हणतात. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो की आज संविधान दिवस आहे. कायद्याचे राज्य आहे, त्यांचं नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा करणे गैर तर आहेच, पण 100 टक्के घटनाविरोधी आहे” असंही भातखळकर म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे “आमच्या अंगावर येणाऱ्यांना सांगू इच्छितो, की तुम्हाला देखील मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाही. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो” असं म्हणताना पाहायला मिळतं.

“देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सगळा वृत्तांत सांगितला आहे. शरद पवार यांनी सरकार बनवण्यास सोबत येण्याचं मान्य केलं होतं. काळाच्या ओघात या सर्व घटना उघड होतील. शरद पवार यांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे” असा घणाघातही अतुल भातखळकरांनी केला. ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकातून लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची इन्साईड स्टोरी सांगितली. यावर भातखळकरांनी भाष्य केले.

वीज बिला संदर्भात ठाकरे सरकारने घूमजाव केले आहे. त्यामुळे आंदोलनं होत आहेत. लोकशाही मार्गाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात भातखळकरांनी मनसेच्या झटका मोर्चावर प्रतिक्रिया दिली. वाढीव वीज बिला संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरात आंदोलन केले. कुठे मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, तर कुठे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

संबंधित बातम्या :

‘कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करुन महाराष्ट्र पुढे जाईल’, मुख्यमंत्र्यांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा प्रोमो

भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या, संजय राऊतांनी ललकारले

(BJP Leader Atul Bhatkhalkar slams Shivsena MP Sanjay Raut for intimidating)