Girish Mahajan: बोला आता! महाजन विचारताय, ‘हा कितवा स्वातंत्र्य दिन?’ कोण आलं मगं संकटमोचकाच्या मदतीला? भरसभेत घडलं काय?
Girish Mahajan on Independence Day: आज सगळीकडे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाला. आता या स्वातंत्र्याला शंभरीचे वेध लागले आहे. पण अनेकांचा आकडेवारीत घोळ होतो. असाच काहीसा प्रकार मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झाला. संकटमोचकच मोठ्या संकटात अडकले.

आज देशभरात मोठ्या उत्साहात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी झाले. देशभरात शासकीय, निम सरकारी आणि खासगी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. आज सगळीकडे उत्साहाचे आणि उत्सवाचा माहौल होता. नाशिकमध्येही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. पण संकटमोचक, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या एका प्रश्नाने सर्वच जण बुचकाळ्यात पडले. हा कितवा स्वातंत्र्यदिन आहे हेच गिरीशभाऊंना आठवत नव्हते. मग त्यांनी कानोसा घेतला, पण हा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्याने आणि माईकमुळे उघड झाला. कोणं आलं मग धावून संकटमोचकाच्या मदतीला?
संकटमोचकावरंच मोठं संकट!
तर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन उपस्थित होते. झेंडावंदनाला ते आले होते. पण हा कितवा स्वातंत्र्यदिन हे मात्र ते विसरले. आता धावपळीत नाही राहिलं त्यांच्या लक्षात. मग त्यांनी सभेत इकडं तिकडं पाहिलं आणि शेजारीत उभ्या असलेल्या नाशिकच्या महापौरांना हा प्रश्न विचारूनही टाकला. हा कितवा स्वातंत्र्यदिन? असा सवाल त्यांनी केला. महापौरांनी लागलीच योग्य उत्तर दिले. हा 80 वा स्वातंत्र्य दिन असल्याचे त्यांनी सांगितले. महाजनांचं कन्फ्युझन होऊ नये यासाठी महापौरांनी अगोदर ऐंशी असं मराठीत सांगितलं. नंतर एटी असं इंग्रजीतही सांगून टाकलं. मग त्यावर गिरीश महाजन यांचं समाधान झाल्याचं दिसलं.
पालकमंत्री पदाचा तिढा, महाजनांना संधी
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2026 रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमधील विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण झाले. पालकमंत्रिपदाच्या तिढ्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार त्यांना ध्वजारोहणाची संधी मिळाली. यावेळी महाजन यांनी भाषण केले. शेतकरी, महिला, युवक, पर्यटन, पर्यावरण आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध महत्त्वपुर्ण उपक्रमांची माहिती त्यांनी न चुकता दिली. यावेळी त्यांची स्मरणशक्तीने धोका दिला नाही. त्यांनी भाषणात नाशिकच्या विकासाचा रोडमॅपच सादर केला.
सौर कृषी वाहिनी, शेतकरी कर्जमुक्ती, वीर प्रेरणा स्थळ, शिव मार्ग आणि राममार्ग यासह विविध विकास योजनांच्या माध्यमातून नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी या भाषणातून व्यक्त केला. शेतकरी, तरुणांना पाठबळ देण्यासोबतच जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या दमदार भाषणाने उपस्थितांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. यावेळी देशभक्तीप घोषणा देण्यात आल्या. पण महाजन यांना स्वातंत्र्य दिनाचा आकडा कसा आठवला नाही, याची कुजबूज सभास्थळी मात्र झाली.
