किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

| Updated on: Nov 13, 2020 | 2:25 PM

मी दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारच्या तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडणार, असे वचन दिले होते. | Kirit Somaiya

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर
Follow us on

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर तीन मोठे घोटाळे केल्याचा आरोप केला आहे. मी दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारच्या तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडणार, असे वचन दिले होते. ते वचन आज मी पूर्ण करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. आपण आता या सगळ्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेनेकडून किरीट सोमय्यांच्या या आरोपावर काय स्पष्टीकरण देण्यात येणार, हे पाहावे लागेल. (Kirit Somaiya allegations on Thackeray govt and BMC)

किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेत या घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे जाहीर केली. यावेळी त्यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबीय यांच्यातील जमीन व्यवहाराचे आणखी 9 सातबारे प्रसारमाध्यमांच्या हाती सोपवले. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जमीन खरेदी प्रकरणावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहे. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

दहिसर भूखंड घोटाळा
अजमेरा बिल्डर्सनी 2 कोटी 55 लाखांना विकत घेतलेली जमीन आता मुंबई महानगरपालिका विकत घेणार आहे. मात्र, मुंबई महागनरपालिकेला या जमिनीसाठी 900 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यवहारासाठीचे 300 कोटी रुपये अजमेरा बिल्डर्सला देण्यात आले आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आता संजय राऊत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये हिंमत असेल तर या आरोपांवर बोलावे, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.

‘शिवसेनेच्या नेत्यांनी गरीब झोपडट्टीवासियांसाठी असलेले गाळे हडप केले’
महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी मध्यमवर्गीयांसाठी असलेली घरे आणि गाळे हडप केले. कोरोनाच्या काळात पालिकेने किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट दिल्याची बाब स्वत: महापौरांनी मान्य केली आहे.

याशिवाय, महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (SRA) सदनिका लाटल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. त्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी फोर्जरी (खोट्या सह्या) केल्या. गेल्या दोन महिन्यांपासून मी याचा पाठपुरावा करुनही मुंबई पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई केलेली नाही.

संबंधित बातम्या:

किशोरी पेडणेकरांवर कारवाई का नाही? सोमय्यांची महापौर, ठाकरे सरकार, मुंबई मनपाविरोधात याचिका

ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला 25 वर्ष घरी बसवू : संजय राऊत

गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जाता, अर्णव तुमचा कोण लागतो?, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना सवाल

(Kirit Somaiya allegations on Thackeray govt and BMC)