विजयी उमेदवारांच्या यशात शिवसेना-भाजपचा वाटा, राष्ट्रवादी-काँग्रेसचे योगदान नाही : सुधीर मुनगंटीवार

| Updated on: Jul 11, 2020 | 7:34 PM

युती उमेदवारांच्या विजयात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे योगदान नाही, अशी टीका मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar on Sharad Pawar interview by Sanjay Raut) केली. 

विजयी उमेदवारांच्या यशात शिवसेना-भाजपचा वाटा, राष्ट्रवादी-काँग्रेसचे योगदान नाही : सुधीर मुनगंटीवार
Follow us on

चंद्रपूर : “शिवसेना-भाजप युतीच्या विजयी उमेदवारांच्या यशात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वाटा होता. मात्र युती उमेदवारांच्या विजयात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे योगदान नाही,” अशी टीका राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच “शिवसेनेचे आमदार पवारांमुळे कसे निवडून आले याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी द्यावं,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले. (Sudhir Mungantiwar on Sharad Pawar interview by Sanjay Raut)

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान पवारांनी “भाजपचे 105 आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेनासोबत नसती तर 105 चा आकडा 40-50 असता,” असे वक्तव्य केले होते.

“भाजप’च्या 105 जागा शिवसेनेमुळेच आल्या असं विधान शरद पवारांनी मुलाखतीदरम्यान केले. मात्र 2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. याकडे पवारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले,” असे मुनगंटीवार म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“भाजप आणि शिवसेनेचे विचार समान नव्हते हे शरद पवार यांचे विधान आश्चर्यजनक आहे. गेली 30 वर्षे आम्ही सोबत होतो. समान तत्त्वावर निवडणुकाही लढवल्या आहेत. मात्र 194 दिवसातच शिवसेना आणि काँग्रेसचे विचार एक झाले याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्वाचा विचार भाजपशी विसंगत होता का? असा सवालही उपस्थितीत केला. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत का?” असाही सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ वाचलेली दीर्घ कविता दर्पयुक्त नव्हतीच. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, समृद्धीसाठी पुन्हा एकदा राज्य करू देत, अशीच भावना त्यात होती. पुन्हा आल्यावर महाराष्ट्र हिताचे निर्णय घेत जनतेला आनंद देणे हाच त्यातला भाव होता,” असेही ते म्हणाले. (Sudhir Mungantiwar on Sharad Pawar interview by Sanjay Raut)

“राजकारणातील कुणीही दर्प करू नये अशी भाजपची भूमिका आहे. सत्ता आली की माजायचे नाही आणि विरोधी पक्षात गेले की लाजायचे नाही अशीच ही भूमिका आहे. फडणवीसांच्या एका वाक्यावरुन त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण केले गेले. मात्र आम्ही शंभर टक्के समाजकारण करतो,” असेही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा – तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

“एखादा विचार जनतेपर्यंत पोहोचवणे यासाठी मुलाखत हे एक उत्तम माध्यम आहे. मात्र ही चर्चा कोविडनंतरच्या महाराष्ट्राच्या उत्थानासाठी खर्ची घालणे गरजेचे होते. शरद पवारांनी आपले अनुभव महाराष्ट्रासाठी खर्ची करणे आवश्यक आहे. संकटाच्या काळात खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यावर मात करण्यासाठी आवश्यक नियोजन मुलाखतीत विशद करणे गरजेचे होते. भाजप-शिवसेना दोघांनी एकमेकांसाठी काम केले आहे. या मुलाखतीपेक्षा महाराष्ट्र हिताची मुलाखत गरजेची होती,” अशीही टीका मुनगंटीवारांनी केली.

“आघाडी सरकारच्या प्रयोगाची यशस्वी गाथा कोणीही स्पष्टपणे सांगू शकणार नाही. मात्र 1978 मध्ये पवारांनी हा प्रयोग केला आहे. त्याची निष्पत्ती ही पवारांना माहीत आहे. सध्याच्या आघाडीसाठी ही आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र अशी आघाडी करणाऱ्या पवार यांनी 1999 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा इटालियन जन्माच्या सोनिया कशा राहू शकतील? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्यांनी पक्ष फोडला होता. त्यामुळे आता काँग्रेसशी घरोबा करुन तुम्ही प्रश्न बदललात की सत्तेसाठी आघाडी केलीत हेही स्पष्ट करावे,” असेही ते म्हणाले. (Sudhir Mungantiwar on Sharad Pawar interview by Sanjay Raut)

संबंधित बातम्या : 

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार