‘..तर झेपत नाही म्हणून जाहीर करा’, मुख्यमंत्र्यांना भाजपचा जोरदार टोला

| Updated on: Jan 27, 2021 | 4:23 PM

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावलाय.

..तर झेपत नाही म्हणून जाहीर करा, मुख्यमंत्र्यांना भाजपचा जोरदार टोला
अतुल भातखळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावलाय. आधी तुमच्या राज्यात असलेल्या औरंगाबादचं संभाजीनगर तर करा, असं खोचक ट्वीट अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर केलं आहे.(Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray over Belgaon issue)

‘बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या ‘संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी ही मागणी केली. कोर्टात एखादं प्रकरण असेल तर त्यानुषंगाने कोणतेही निर्णय घ्यायाचे नसतात. कारण तो कोर्टाचा अवमान समजला जातो. पण कर्नाटक व्याप्त भूभागाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगावचं नामांतर केलं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधिमंडळाचं अधिवेसनही घेतलं. कर्नाटकची ही मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता हा वादग्रस्त भागच केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे. कोर्टात ही मागणी करायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक सरकार बेलगाम वागत आहे. जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित झालाच पाहिजे, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी ठणकावलं.

औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा तापला

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीवर शिवसेनेनं पुन्हा एखदा जोर धरला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेचा महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसनं तीव्र विरोध केला आहे. नाव बदलून विकास होत नाही. महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर बनली आहे आणि त्यात शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा कुठेही नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. दुसरीकडे भाजप आणि मनसेकडून संभाजीनगरच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची कोंडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

सीमावादावर शेवटचं हत्यार कोणतं? शरद पवार म्हणाले…..

Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray over Belgaon issue