EVM वर शंका उपस्थित करणाऱ्या 22 पक्षांना अमित शाहांचे 6 प्रश्न

| Updated on: May 22, 2019 | 4:34 PM

नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये एनडीएचा विजय होताना दिसताच 22 पक्षांनी ईव्हीएमविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. शिवाय देशभरातील 22 विरोधी पक्षांनी ईव्हीएम सुरक्षित नसल्याचं सांगत निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशयही व्यक्त केला. यामध्ये आता भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी उडी घेतली आहे. याच ईव्हीएमवर कधी ना कधी या विरोधी पक्षांनीही निवडणूक जिंकली आहे, तेव्हा काहीही अडचण का […]

EVM वर शंका उपस्थित करणाऱ्या 22 पक्षांना अमित शाहांचे 6 प्रश्न
Follow us on

नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये एनडीएचा विजय होताना दिसताच 22 पक्षांनी ईव्हीएमविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. शिवाय देशभरातील 22 विरोधी पक्षांनी ईव्हीएम सुरक्षित नसल्याचं सांगत निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशयही व्यक्त केला. यामध्ये आता भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी उडी घेतली आहे. याच ईव्हीएमवर कधी ना कधी या विरोधी पक्षांनीही निवडणूक जिंकली आहे, तेव्हा काहीही अडचण का नव्हती? असा प्रश्न विचारत हा जनतेच्या मताचा अनादर असल्याचं म्हणत अमित शाहांनी सहा प्रश्न विचारले आहेत.

पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशभरात शांततेत निवडणूक पार पडली. 1977 ते 2014 या काळात शांततापूर्ण मार्गाने भारताचा गौरव वाढलाय. पण स्वार्थासाठी विरोधी पक्ष निवडणूक आयोगाची आणि लोकशाहीची प्रतिमा मलीन करत आहेत. या निवडणुकीत जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य करायलाच हवा, कारण तो देशातील 90 कोटी जनतेने दिलेला निर्णय आहे. जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे, असं अमित शाहांनी म्हटलंय.

“ईव्हीएमचा विरोध हा देशातील जनतेच्या मताचा अनादर आहे. पराभवाच्या भीतीने बिथरलेल्या 22 पक्षांनी देशात आणि जगात लोकशाहीची प्रतिमा मलीन करण्याचं काम सुरु केलंय. या सर्व पक्षांच्या मागण्यांना कोणताही अर्थ नसून यामागे फक्त स्वार्थ दडलेला आहे. मला या सर्व पक्षांना काही प्रश्न विचारायचे आहेत,” असं म्हणत अमित शाहांनी सहा प्रश्न विचारले आहेत.

पहिला प्रश्न

ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या सपा, बसपा, काँग्रेस, टीएमसी या सर्व पक्षांनी कधी ना कधी ईव्हीएमवर निवडणूक जिंकली आहे. दिल्लीत आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने चार राज्यांमध्ये सत्ता मिळवली. पण आम्ही कधीही ईव्हीएमवर शंका घेतली नाही. विरोधकांचा विजय झाला तर तो विजय आणि पराभव झाला तर तो ईव्हीएममुळे झाला, असं आपण मानायचं का? या पक्षांना ईव्हीएमवर विश्वास नव्हता तर त्यांनी जिंकल्यानंतर सत्तेची सूत्र का सांभाळली?

दुसरा प्रश्न

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने तीन जनहित याचिका ऐकल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिलंय. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाच व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे. या पक्षांना सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का?

तिसरा प्रश्न

मतमोजणीच्या दोन दिवस अगोदर 22 पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याची मागणी करणे हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे. कारण, निवडणूक प्रक्रियेत बदल सर्व पक्षांच्या सहमतीशिवाय होऊच शकत नाही.

चौथा प्रश्न

विरोधकांनी ईव्हीएमवर शंका सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर आणि विशेषतः एक्झिट पोलनंतर उपस्थित केली. एक्झिट पोल हा ईव्हीएमच्या आधारावर नाही, तर मतदानानंतर मतदाराशी बोलून केला जातो. तुम्ही एक्झिट पोलच्या आधारावर ईव्हीएमवर शंका कशी उपस्थित करु शकता?

पाचवा प्रश्न

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ईव्हीएम हॅक करुन दाखवण्याचं खुलं आव्हान दिलं होतं. पण तेव्हा कुणीही हे आव्हान स्वीकारलं नाही. यानंतर आयोगाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची जोडणी करुन आणखी पारदर्शकता आणली. व्हीव्हीपॅटमुळे आपण कुणाला मत दिलं त्याची चिठ्ठी मतदारांना मिळते. एवढी पारदर्शकता असूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करणं कितपत योग्य आहे?

सहावा प्रश्न

आपल्या बाजूने निकाल न आल्यास रक्ताचे पाट वाहण्याची आणि शस्त्र हातात घेण्याची भाषा काही विरोधी पक्ष करत आहेत. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतंही स्थान नाही हे मला काँग्रेससह विरोधी पक्षांना सांगायचंय. या वक्तव्यातून विरोधक कुणाला धमकी देत आहेत ते त्यांनी स्पष्ट करावं