विधानसभा निवडणुकीत भाजप 80च्या दशकातील फॉर्म्युला वापरणार?, काय आहे फॉर्म्युला?; विजयाचा मार्ग सोपा होणार?

| Updated on: Jun 02, 2023 | 8:37 AM

राज्यातील सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'माधव' फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या हालचालीही सुरू केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजप 80च्या दशकातील फॉर्म्युला वापरणार?, काय आहे फॉर्म्युला?; विजयाचा मार्ग सोपा होणार?
bjp
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पुढच्या वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत शिंदे गट-भाजप युतीला महाविकास आघाडीचं तगडं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील झाल्यास भाजपला सत्तेच्या आसपासही जाणं मुश्किल होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप 80च्या दशकातील आपल्या जुन्याच फॉर्म्युल्याकडे जाण्याची शक्यता आहे. ‘माधव’ नावाचा फॉर्म्युला भाजप राज्यात राबवणार असल्याची चिन्हे आहेत. ‘माधव’ म्हणजे, माळी, वंजारी आणि धनगर. ओबीसी समुदायातील हा वर्ग आहे. राज्यातील या सधन जाती आहेत. या जातींना आपल्याकडे वळतं करून राज्यात सत्ता आणायची अशी भाजपची खेळी आहे. अहमदनगरचं नाव बदलून आहिल्या नगर करणं हा त्याच खेळीचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या साहस, परोपकार आणि धार्मिकतेचं प्रतिक आहेत. धनगर समाज आहिल्यादेवींना देवासारखं पुजतो. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात धनगर समाजाचं मोठं प्राबल्य आहे. राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघात या समाजाचं अस्तित्व आहे. त्यामुळे या समाजाने ठरवलं तर 100 मतदारसंघाचा निकाल बदलू शकतो. तर 40 विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक आहेत.

हे सुद्धा वाचा

80 च्या दशकापासूनच भाजपने माधव फॉर्म्युला स्वीकारला होता. 2014मध्ये तर धनगर, माळी आणि वंजारी समाजाला एकत्र करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अथक प्रयत्न केले होते. निवडणुकीत भाजपला त्याचा फायदाही झाला होता. भाजपने 2014मध्ये धनगर समाजाला अनुसूचित जनजातीचा दर्जा देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र, भाजपने हे आश्वासन पाळलं नाही. त्याबदल्यात भाजपने रासप नेते महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं. जानकर हे धनगर समाजातील नेते आहेत. त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता.

मराठा नेत्यांना महत्त्व

2014मध्ये भाजपने माळी, धनगर आणि वंजारी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं. मात्र, सत्ता येताच भाजपमध्ये मराठा नेत्यांनी प्रवेश घेण्यास सुरुवात केली आणि पक्षात मराठा समाजाला अधिक महत्त्व मिळालं. त्यामुळे माळी, धनगर आणि वंजारी समाज मागे पडला होता.

भागवतांनी आणला फॉर्म्युला

सुरुवातीच्या काळात भाजप हा पक्ष विशिष्ट जातीपूरता मर्यादित होता. त्यामुळे भाजप नेत्यांनी भाजपचा चेहरा बदलण्यासाठी अथक प्रयत्न केले. वसंतराव भागवत यांनीच भाजपचा चेहरा बदलण्यासाठी माधव फॉर्म्युला आणला. त्यासाठी त्यांना गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर आणि महादेव शिवणकर यांच्यासह इतर नेत्यांची साथ लाभली.

ओबीसी नेत्यांना खेचण्याचा प्रयत्न

भाजपने राज्यात सोशल इंजिनीअरिंगला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद दिलं आहे. राज्यात ओबीसी नेते अतुल सावे यांना मंत्रीपद दिलं आहे. तर भाजपचं प्रदेशाध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलं आहे. बावनकुळे हे सुद्धा ओबीसी आहेत.