EXCLUSIVE : आरामात चौथा उमेदवार निवडून आणणार : देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 05, 2020 | 6:52 PM

राज्यात एकीकडे कोरोना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असताना, त्याचवेळी विधानपरिषद निवडणुकीचीही रेलचेल (Devendra Fadnavis claims on MLC fourth seat) सुरु झाली आहे.

EXCLUSIVE : आरामात चौथा उमेदवार निवडून आणणार : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असताना, त्याचवेळी विधानपरिषद निवडणुकीचीही रेलचेल (Devendra Fadnavis claims on MLC fourth seat) सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने, या निवडणुकीला वेगळं महत्त्वं आहे. उद्धव ठाकरे यांना 27 मेपूर्वी विधीमंडळाच्या दोनपैकी एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे. राज्यपालांनी मंत्रिमंडळ शिफारस न स्वीकारता निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने 21 मे रोजी विधानपरिषदेतील रिक्त 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली. (Devendra Fadnavis claims on MLC fourth seat)

आता या रिक्त 9 जागांपैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या तर 3 जागा भाजपच्या हमखास निवडून येतील, हे संख्याबळावरुन स्पष्ट होतं. मात्र एका जागेसाठी चुरस आहे. काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्याबाबत महाविकास आघाडी आज बैठक घेऊन रणनीती ठरवणार आहे. मात्र भाजपनेही चौथी जागा आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीकडे प्रतिक्रिया देताना, भाजप चौथी जागा जिंकेल असा दावा केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपकडे चौथ्या जागेसाठी अपेक्षित संख्याबळ आहे. आरामात चौथा उमेदवार निवडून आणणार”

कुणाचं संख्याबळ काय?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत आणा, एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक

विधानपरिषदेची निवडणूक कधी?

कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली. (Maharashtra legislative council polls).

कोणत्या जागांसाठी निवडणूक

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. (Maharashtra Legislative Council Poll BJP Candidates)

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला, विधानपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर   

MLC Polls : भाजपला विधानपरिषदेच्या तीन जागा निश्चित, पण चार नावं शर्यतीत?