उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

| Updated on: Dec 22, 2020 | 5:48 PM

Ahmednagar News : भाजपमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नगरमधील अकोले इथं हा 'चमत्कार' घडला आहे.

उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Follow us on

अहमदनगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेत  (BJP Shiv Sena) प्रवेश करणाऱ्यांचा लोंढा होता. मात्र हा लोंढा आता उलट दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. चक्क भाजपमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Congress President Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत नगरमधील अकोले इथं हा ‘चमत्कार’ घडला आहे. संगमनेर आणि अकोले इथल्या भाजपा कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरात‌ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (BJP workers enters in Congress at Ahmednagar in presence of Balasaheb Thorat)

“गेल्या काही काळात‌ लोकं गेली. पण त्यांची ‌वाट‌ चुकली, ते ‌परत‌ येत‌ आहेत. सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते” असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक आजी-माजी आमदार, खासदारांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. जिथे आमदार-खासदार फुटले तिथे कार्यकर्तेही आलेच. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला अक्षरश: भगदाड पडलं. आता हळूहळू हे भगदाड बुजवण्यास आता सुरुवात झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने मेगाभरती सुरु केली आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेसनेही आपली झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे.

भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लवकरच आमच्याकडे येणार आहेत. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कुणी जाणार नाही असे खोटे दावे करत आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपमधून महाविकास आघाडीत आणि काँग्रेसमध्ये अनेक जण प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्षाचा विचार शाश्वत आहे. तो देशहिताचा आहे. आज भाजप, आरएसएस समाजात भेद निर्माण करून सत्तेवर जात आहेत. त्यांचं काम देशहिताचं नाही.

थोरांताचा केंद्रावर हल्लाबोल

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहे. एक महिना हजारो शेतकरी दिल्लीला वेढा घालून भसले आहेत. केंद्र सरकारला सहानुभूती नाही. केंद्र सरकार अडेलतट्टू आणि क्रूर भूमिका घेत आहे. शेतकरी मूलभूत प्रश्न विचारत आहेत. पण केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही, असं थोरात म्हणाले.

देश नव्याने उभा करावा लागेल

गरीब माणसाला ताकद देणारे कामगार हिताचे कायदे बदलण्याचं काम केलं. काही मूठभर लोकांसाठी कृषी कायदे केले. साठेबाज लोकांसाठी हे कायदे केले. देशहिताचं हे काम नाही. जे चाललंय ते आपल्याला आधी थांबवावे लागेल आणि देश पुन्हा उभा करण्याचं काम करावं लागेल, असं बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

(BJP workers enters in Congress at Ahmednagar in presence of Balasaheb Thorat)

संबंधित बातम्या  

नागपुरात भाजपला मोठा धक्का, व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?: राऊत