Aaditya Thackeray : भाजपाचं मुंबई मिशन ठरलं, शिवसेनेचे काय? आदित्य ठाकरेंनी सांगितले मुंबई-शिवसेनेचे नातं..!

| Updated on: Sep 08, 2022 | 2:53 PM

मुंबई महापालिकेत राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे. जे अधिकारी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मुंबईकरांची सेवा करीत आहेत, त्यांच्या बदल्या रात्रीतून होत आहेत. केवळ पत्रव्यवहारावर सर्वकाही होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम नेमके कसे करावे असा सभ्रम आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बदली सरकारचा प्रत्यय प्रत्येक मुंबईकर घेत आहे.

Aaditya Thackeray : भाजपाचं मुंबई मिशन ठरलं, शिवसेनेचे काय? आदित्य ठाकरेंनी सांगितले मुंबई-शिवसेनेचे नातं..!
आ. आदित्य ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : (Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका दौऱ्यानंतर (Mumbai Municipal Election) मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 150 नगरसेवकांचे मिशन ठरले असले तरी मुंबई कुणाची हे सबंध राज्यातील जनतेला माहिती आहे. शिवाय गेल्या 25 वर्षापासून मुंबईकरांची सेवा करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे. त्यामुळे कोणी कोणतेही मिशन ठरवले तरी मुंबईकरांचे आणि शिवसेनेचे नाते सर्वांना माहित आहे.   या मिशनचा आणि गद्दारांचा कोणताही परिणाम मतदारांवर होणार नसल्याचा विश्वास (Aaditya Thackeray) आ. आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. tv9 मराठी कार्यालयातील बाप्पांच्या दर्शनासाठी आल्यावर त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

बीएमसीमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप

मुंबई महापालिकेत राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे. जे अधिकारी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मुंबईकरांची सेवा करीत आहेत, त्यांच्या बदल्या रात्रीतून होत आहेत. केवळ पत्रव्यवहारावर सर्वकाही होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम नेमके कसे करावे असा संभ्रम आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या होत आहेत, त्यामागे सरकारचा नेमका उद्देश काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबईकर करीत आहेत. यामागे नेमका हेतू काय हे देखील मुंबईतील सुज्ञ नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे अटी-नियमांचा विचार राज्य सरकारकडून केला जात नसला तरी जनता मतदानातून हिशोब चुकता करणार हे निश्चित असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

शिवसेना अन् मुंबईकरांचे असे हे नाते

गेल्या 25 वर्षापासून शिवसेना ही मुंबईकरांची सेवा करीत आहे. ‘एमटीए’ चे 80 प्रोजेक्ट हे शिवसेनेने केलेले आहेत. मात्र, त्यावर आता बैठका देखील होत नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 5 ते 6 मंत्री हे मुंबईतील होते, त्यामुळे अनेक विषय मार्गी लागलेले आहेत. यामध्ये फूटपाथ चांगले झाले आहेत, नवीन सिग्नल, रस्त्यांची कामे, बागांचे शुशोभिकरण अशा कामांना आता पूर्णविराम लागलेला आहे. त्यामुळे केवळ मिशन घेऊन उपयोग नाहीतर प्रत्यक्ष कृतीदेखील महत्वाची आहे.

आता जनताच संभाळून घेईल

मुंबई महापालिके शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या युतीवरील उत्तराला आदित्य ठाकरे यांनी बगल दिली. कठीण काळात या दोन्ही पक्षाने शिवसेनेला साथ दिलेले आहे. मात्र, मुंबई महापालिकेत जनताच शिवसेनेला सांभाळून घेईल असा विश्वास व्यक्त केला. तर ज्या सरकारची ओळख ही बदली सरकार म्हणून होत आहे, ते मुंबईकरांना काय सांभाळून घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.