येऊ का ‘झाडू’ मारायला?, दिल्ली, पंजाब जिंकल्यानंतर ‘आप’चा मुंबई महापालिकेवर डोळा; सर्व जागा लढण्याची घोषणा

| Updated on: Mar 29, 2022 | 6:29 PM

देशाची राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये आपला झेंडा गाडल्यानंतर आता आम आदमी पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. आपने उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केलीय.

येऊ का झाडू मारायला?, दिल्ली, पंजाब जिंकल्यानंतर आपचा मुंबई महापालिकेवर डोळा; सर्व जागा लढण्याची घोषणा
आम आदमी पार्टी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : महापालिका निवडणुकीचे (Municipal Election) वारे सध्या राज्यात वाहत आहे. मुंबई, पुण्यासाठी राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुका चालू वर्षात होण्याचीच शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेनेसह (Shivsena) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसनंही (Congress) जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपही आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहे. अशावेळी देशाची राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये आपला झेंडा गाडल्यानंतर आता आम आदमी पक्ष (Aam Aadami Party) मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. ‘येऊ का झाडू मारयला?’ असा प्रश्न विचारत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपने महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर बोट ठेवल्याचं पाहायला मिळतं आहे.

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपला असला तरी अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही. अशावेळी आम आदमी पक्षाने उमेदवार निवडीला सुरुवात केलीय. तसंच सोशल मीडियातून प्रचारही सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीत केलेल्या विकासाचा मुद्दा घेऊन आप मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महापालिकेच्या सर्व 236 जागा लढवण्याचा आपचा विचार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली असल्याची माहितीही आपचे मुंबई सचिव संदीप मेहता यांनी माध्यमांना दिलीय. तर ‘दिल्ली बदली अब मुंबई की बारी…’ असा नारा आपने दिलाय.

आपचे उमेदवार कसे असणार?

स्वच्छ चारित्र्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसलेले उमेदवार देण्यावर आपचा भर असतो. त्यामुळे चांगलं शिक्षण झालेला आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार आम्ही देणार असल्याची माहिती आपच्या नेत्यांनी दिलीय. आपने उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासही सुरुवात केलीय. आप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्व ताकदीने उतरणार आहे. आमच्या किमान 36 जागा निवडून येतील, असा विश्वासही आप नेत्यांनी व्यक्त केलाय.

महाविकास आघाडी एकत्र की स्वतंत्र?

सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतही हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र अशी चर्चा होती. मात्र मुंबई काँग्रेसची धुरा हाती घेतल्यानंतर भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढू शकतात. मात्र अंतिम निर्णय काय होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

मुंबई मनपावर भगवा फडकवण्याचा भाजपचा निर्धार

दुसरीकडे शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. मुंबई मनपावर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.

मनसेची काय भूमिका?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्याचे अनावरण आणि शिवसेना आणि भाजप यांचा काडीमोड झाल्यापासूनच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींनंतर या चर्चांना हवा मिळत असे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मनसे-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर प्रवीण दरेकर यांनी गरज पडल्यास युती करण्याची तयारी दाखवली होती.

इतर बातम्या : 

‘तुकड्यावर जगणारांनी शहाणपणा शिकवू नये’, सदाभाऊंचा मिटकरींवर पलटवार; पवारांवरील टीकेवरुन दोघांत जुंपली

आशिषजी, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा…; शिवसेना नेत्या Manisha Kayande यांचा शेलारांना इशारा