मंत्रिमंडळ विस्तार हा विषय खूप पांचट झालाय, हा विषय संपला पाहिजे; शिवसेनेच्या आमदाराची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 16, 2023 | 8:52 AM

Shivsena MLA Sanjay Gaikwad on Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपण काही मागितलं नाही आणि आपल्याला काही घ्यायचं नाही; शिवसेनेच्या आमदाराचं वक्तव्य

मंत्रिमंडळ विस्तार हा विषय खूप पांचट झालाय, हा विषय संपला पाहिजे; शिवसेनेच्या आमदाराची प्रतिक्रिया
Follow us on

बुलढाणा : मागच्या वर्षभरापासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची नाराजी पाहायला मिळत आहे. अशात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा विषय खूप पांचट झाला आहे. आता लवकर विस्तार झाला पाहिजे अन् हा विषय संपला पाहिजे, असं ते म्हणाले.

अजितदादांसोबत जे काही झालं ते सगळ्यांनी पाहिलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री होत होते, मात्र त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. दिल्लीला खासदार म्हणून पाठवलं. त्यांना राज्यात ठेवायचं नव्हतं. अजितदादांचं प्रस्थ वाढत आहे, अशी शरद पवारसाहेबाना कुणकुण लागली. त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा फंडा आणला, असं संजय गायकवाड म्हणाले.

शरद पवारांनी भावनिक करून सगळ्यांना सोबत घेतलं. नंतर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेलची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. पण अजितदादांना काहीच दिलं नाही. अजितदादांनी अल्टिमेटम दिला होता. त्यानतंर त्यांनी हा वेगळा विचार केला, असं संजय गायकवाड म्हणाले.

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. पण या मंत्रिमंडळ विस्तारमध्ये आपण काही मागितलेलं नाही. मला काही घ्यायचं पण नाही. मंत्रिमंडळ विस्तार आता खूप पांचट विषय झाला आहे. लवकर विस्तार होऊन हा विषय संपला पाहिजे, असं माझं मत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या सगळ्या भूमिकेचं नवल वाटतं. सुप्रीम कोर्टाला माहिती आहे की विधानसभेत हस्तेक्षेप करायचा अधिकार नाही. तर त्यांनी वर्ष दीड वर्ष या सगळ्यात का घालवले आणि शेवटी निकाल हाच दिला की यात आम्हाला अधिकार नाही. मग कशासाठी पुरावे मागितले? सुनावणी घेतली? एकाच शब्दात सांगायचं की आमचा संबंध नाही म्हणून…, असं संजय गायकवाड म्हणालेत.

आताही कोर्ट विधानसभा अध्यक्षांना कोर्ट टाईम बाँड देऊ शकत नाही. अध्यक्षाला जेव्हा वाटेल तेव्हा तरतूद प्रमाणे ते निकाल देतील. पण अपत्रतेचा निर्णय होऊ शकत नाही, असा दावाही गायकवाड यांनी केला आहे.

काहीही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्री होऊ देणार नाही. बुलढाणा जिल्ह्यात 2 शिवसेना आणि 3 भाजपचे आमदार आहेत. इथे आम्हाला बहुमत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री पद मिळू देणार नाही, असं म्हणत बुलढाण्याचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळू शकत नाही असं संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.