पवित्र ‘मातोश्री’त हिरव्या सापाला येऊ देणार नाही: चंद्रकांत खैरे

| Updated on: Jan 04, 2020 | 4:37 PM

औरंगाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची दोन मतं फुटल्याने, सेनेचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला.

पवित्र मातोश्रीत हिरव्या सापाला येऊ देणार नाही: चंद्रकांत खैरे
Follow us on

औरंगाबाद : “शिवसेनेत येऊन मंत्रिपद मिळवणाऱ्या अब्दुल सत्तारांची (Chandrakant Khaire attacks on Abdul Sattar) गद्दारी सहन करणार नाही. त्यांना पक्षातून हाकललं पाहिजे. इतकंच नाही तर गद्दारी करुन रंग दाखवणाऱ्या या हिरव्या सापाला पवित्र ‘मातोश्री’ची पायरी चढू देणार नाही”, असा हल्लाबोल शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire attacks on Abdul Sattar) यांनी केला.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची दोन मतं फुटल्याने, सेनेचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला.

या अनपेक्षित निकालाने संतापलेल्या चंद्रकांत खैरेंनी अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केला. “शिवसेनेने अब्दुल सत्तारांना विधानसभेचं तिकीट दिलं, निवडून आल्यावर त्यांना मंत्रिपद दिलं. मात्र आता सत्तार म्हणतात मी मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे फेकून दिला आहे. इतकंच नाहीतर सत्तारांनी शिवसेनेचं मंत्रिपद मिळवून झेडपी निवडणुकीत भाजपला मदत केली. अब्दुल सत्तारांची ही गद्दारी खपवून घेतली जाणार नाही” असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

शिवसेना संघटनेशी त्यांनी गद्दारी केली. मातोश्रीसारख्या पवित्र ठिकाणी हिरव्या सापाला येऊ देणार नाही, त्यांनी खरा रंग दाखवला. त्याला पक्षात घेतलं, तिकीट दिलं, मंत्रिपद दिलं, अध्यक्षपदही दिलं, जुने कार्यकर्ते ओरडू लागले. आम्ही लाठ्याकाठ्या, दगडं खाऊन शिवसेना मोठी केली, जेलमध्ये गेलो, लॉक अपमध्ये होतो, असं चंद्रकांत खैरेंनी सांगितलं.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मध्यस्थी करु नये. अब्दुल सत्तार यांना ‘मातोश्री’ची पायरी चढू देणार नाही, त्यांना काढलंच पाहिजे. (उद्या दुपारी 12.30 वाजता सत्तार मातोश्रीवर जाणार आहेत) सत्तारांनी आधी काँग्रेसला शिव्या दिल्या. सत्तार आणि दानवे यांची ही मिलीभगत आहे, प्रत्येक निवडणुकीत ते हेच करतात, असा आरोप खैरेंनी केली.

सत्तारांनी काल सांगितलं मी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा फेकला, अध्यक्षांना राजीनामा देणार. अशा माणसाने आमच्या कष्टावर विरजण घातलेलं सहन करणार नाही. मंत्री केल्यावर त्याने भाजपसोबत का जावं? आमच्या सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे मतदान केलं. ज्या शिवसेनेने तुम्हाला मंत्री केलं, त्याविषयी असं मत का, असा सवाल खैरेंनी केला.

औरंगाबाद झेडपी निवडणुकीत धक्के

प्रचंड चुरस, धाकधूक वाढवणारी परिस्थिती आणि नाट्यमय घडामोडी अशा औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत (Aurangabad Zilha Parishad Election) महाविकास आघाडी नशीबवान ठरली, मात्र भाजपनेही मुसंडी मारली. कारण जिल्हा परिषद अध्यक्षपदी समसमान मतं पडल्याने चिठ्ठ्या उडवून ठरवलेल्या निकालात महाविकास आघाडीच्या (Aurangabad Zilha Parishad Election) मीनाताई शेळके विजयी झाल्या. मात्र उपाध्यक्षपदी भाजपच्या एल जी गायकवाड यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या शुभांगी काजवे यांचा पराभव केला.

अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मीनाताई शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोनगावकर यांना 30-30 अशी समान मतं पडली.

यानंतर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीतही अशीच मतं अपेक्षित असताना, भाजपने बाजी मारुन शिवसेनेला धक्का दिला. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची 2 मतं फुटली. त्यामुळे भाजपला 32 आणि शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ 28 मतं मिळाली.

संबंधित बातम्या  

चुरस, धाकधूक आणि नाट्यमय घडामोडी, औरंगाबादेत अध्यक्ष महाविकास आघाडीचा, उपाध्यक्ष भाजपचा!