नुकसान भरपाई घरात बसून द्यायची नसते, त्यासाठी बांधावर जावे लागते- चंद्रकांत पाटील

| Updated on: Oct 18, 2020 | 3:16 PM

सत्ताधारी पक्षातील काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आग्रही असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. | Chandrakant Patil

नुकसान भरपाई घरात बसून द्यायची नसते, त्यासाठी बांधावर जावे लागते- चंद्रकांत पाटील
Follow us on

सांगली: नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावे लागते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत. आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासह अन्य मागाण्यांसाठी आंदोलने करावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. (Chandrakant Patil Criticised CM Uddhav Thackeray)

तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आग्रही असल्याचा दावाही पाटील यांनी केला. विरोधक आक्रमक झाले तर आपली आमदारकी धोक्यात येईल, अशी भीती सत्ताधारी पक्षातील काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळे हे आमदार स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांवर सरकारमधून बाहेर पडण्याासाठी दबाव आणत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘विधानपरिषद मिळणार असल्याने राजू शेट्टी शांत झालेत’
एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना विधानपरिषदेचे वेध लागल्याने ते शांत बसले आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्य सरकरने मदतीबाबत केंद्राकडे मागणी केली का? राज्य सरकारने कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का?, असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले.

उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर विरोधकांची जोरदार टीका
उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार हे अनुक्रमे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी अगोदरच बाहेर पडले आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याची कार्यपद्धती विरोधकांच्या टीकेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील परिस्थितीची शून्य जाण; आजवरचा सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री: राणे

(Chandrakant Patil Criticised CM Uddhav Thackeray)