साहेब, किती लोकांची माफी मागणार?, मी ओबीसी नेता म्हणूनच आलात ना?; छगन भुजबळ यांचा शरद पवार यांना सवाल

सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करायचं ठरलं. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचंही नाव घेतलं. पण पटेल नाराज झाले. उपाध्यक्ष असताना दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर असताना तिसऱ्या क्रमांकावर कसा जाऊ असं ते म्हणाले. पटेल राजीनामा द्यायला निघाले. मी त्यांना समजावलं.

साहेब, किती लोकांची माफी मागणार?, मी ओबीसी नेता म्हणूनच आलात ना?; छगन भुजबळ यांचा शरद पवार यांना सवाल
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2023 | 12:59 PM

चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : माझा अंदाज कधी चुकत नसतो. पण यावेळी चुकला. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. आपली चूक सुधारली पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलोय, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काल येवल्याच्या सभेत म्हणाले होते. शरद पवार यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. साहेब, तुम्ही किती लोकांची आणि कुणाकुणाची माफी मागणार आहात? असा सवाल करतानाच मी केवळ ओबीसी नेता आहे म्हणून तुम्ही माझ्या मतदारसंघात आलात का? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. तसेच येवल्यातून मला निवडणुकीला उभं करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला नव्हता तर मीच त्यांना येवल्यातून लढणार असल्याचं सूचवलं होतं, असा दावाही भुजबळ यांनी केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

शरद पवार यांनी येवल्याच्या जनतेची माफी मागितली. मी चुकीचा उमेदवार दिला, असंच त्यांना म्हणायचं होतं. त्या आधी ते येवल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं होतं. बारामतीनंतर येवल्याचाच विकास झाला. येवल्याचं प्रशासकीय संकूल आदर्श मॉडेल झालं पाहिजे. सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असली पाहिजे, असं ते म्हणाल होते, असं छगन भुजबळ म्हणाले.

येवल्यात का आले?

शरद पवार येवल्यात का आले ते कळलं नाही. हा ओबीसीचा नेता आहे, त्याच्याकडे गेलं पाहिजे असं वाटलं असेल. साहेब तुम्ही माफी किती मागणार? किती जणांची माफी मागणार? 50 ठिकाणी माफी मागणार आहात का? किती ठिकाणी माफी मागणार? गोंदियापासून लातूरपर्यंत माफी मागणार का? असा सवाल त्यांनी केला. दिलीप वळसे पाटील तुमचे पीए होते. तुमच्यासोबत त्यांचे वडील होते. त्यांच्या आंबेगावला मिटिंग घ्यायचं ठरवूनही मिटिंग घेतली नाही, अशी टीका त्यांनी केली.

ही सर्व मंडळी का गेली?

साहेब हे झालं कुठून? तुमच्या घरातून झालं. 62 वर्ष तुम्ही ज्यांना सांभाळलं ते अजित पवार उपमुख्यमंत्रीही झाले. ही सर्व मंडळी का गेली? याचा विचार करा ना? प्रफुल्ल पटेल का जातात? ते तर तुमच्या सर्वात जवळचे होते. सोनिया गांधी असो की पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांशी चर्चा करायला तुम्ही पटेलांनाच पाठवायचा ना? मग हे सर्व का सोडून गेले. याचा विचार करा, असं भुजबळ म्हणाले.

राजीनामा द्यायला सांगितला

तेलगी प्रकरणात कारण नसताना मला राजीनामा द्यायला सांगितला. मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सीबीआयने माझी चौकशी केली. सीबीआयच्या एफआयआरमध्ये माझं नाव नव्हतं. त्यानंतर मला अनेक ठिकाणी निवडणुकीसाठी मागणी आली. जुन्नरपासून येवल्यापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मतदारसंघातून उभं राहण्याची विनंती केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

मीच म्हणालो, येवल्यात जातो

शरद पवार यांनी जुन्नरमधून लढण्यात सांगितलं. त्या चर्चेत 15 दिवस, महिना गेला. लासलगाव आणि येवल्यातील लोक येत होते. येवल्यातून लढण्याची ऑफर देत होते. मी त्यांना विचारलं कशासाठी माझ्या नावाचा आग्रह धरता. तर ते म्हणाले, आमचा तालुका दुष्काळग्रस्त आहे. विकास झालेला नाही. त्यामुळे तुम्ही या. त्यामुळे मी पवारांना सांगितलं मी येवल्याला जातो. तिथं विकास नाही.

मला शरद पवारांनी येवल्याला पाठवलं नाही. मीच येवल्याला जातो म्हणून शरद पवार यांना सांगितलं होतं. तिथून जिंकून येणं सोपं नव्हतं. एकदा नव्हे तर चारवेळा लोकांनी निवडून दिलं. कारण मी येवल्याचा विकास केला. काम केलं होतं. एकदा तिकीट दिलं जातं, निवडूनही आणलं जातं. पण वारंवार निवडून आणता येत नाही. त्यासाठी काम करावं लागतं. ते मी केलं, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us