Chagan Bhujbal : तुफान जो आया है, मराठीत बोलता बोलता हिंदीत खरी बातमी देऊन गेले छगन भुजबळ

| Updated on: Jun 21, 2022 | 3:37 PM

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार रिचेबल आहेत. तर शिवसेनेचे अर्धे रिचेबल आणि अर्धे नॉट रिचेबल आहेत. पण उरलेलेही संपर्कात येतील, अशी शक्यता आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

Chagan Bhujbal : तुफान जो आया है, मराठीत बोलता बोलता हिंदीत खरी बातमी देऊन गेले छगन भुजबळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः तुफान जैसा आया है.. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर आलेल्या संकटावर बोलताना मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी अगदी सूचक प्रतिक्रिया दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून बनलेल्या सरकारला भाजपनं आव्हान दिलंय. भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जवळपास 30 आमदारांनी बंड पुकारलं आहे. राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन करावा, असा प्रस्तावही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडी सरकार वाचवायचं की आमदारांना वाचवायचं, अशा धर्मसंकटात शिवसेना सापडली आहे. महाराष्ट्रातील सरकारवर आलेल्या या संकटावर प्रतिक्रिया विचारली असता, राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनीही याबद्दल गांभीर्यानं प्रतिक्रिया दिली. सरकारमध्ये निश्चितपणे वादळ आलं आहे. मात्र काही वेळानं ते नक्की शमणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले छगन भुजबळ?

विधान परिषद निवडणुकीचा निकाल आणि महाविकास आघाडीवर आलेलं संकट या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ते म्हणाले, ‘ शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. वादळ आलय .. निश्चितपणे शमणार आहे. महाराष्ट्रातील सरकार, उद्धव ठाकरे, काँग्रेस स्थिर आहे. सरकार पडेल असं वाटतंय, हे वाटणं साहजिक आहे. मात्र आलेलं संकट दूर करण्यासाठी शिवसेनेचे नेते सूरतला पोहोचलेत. यावरून काहीतरी तोडगा निघेल… असं बोलतानाच हिंदी भाषेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी या संकटाला अधिक गंभीरतेने अधोरेखित केलं. ते म्हणाले, तुफान जैसा आया है.. हमारी राजनीती में. तुफान आता है तो शांत भी होता है. शाम तक या कल तक सारी बाते शांत हो जाएगी…. .

शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं…

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंवरील शिवसेनेनं केलेल्या कारवाईबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आता एकनाथ शिंदे सूरतला जाऊ बसलेत. त्यामुळे आमदारांना सांभाळण्यासाठी कुणीतरी नेता हवाय. त्यामुळे शिवसेनेनं गटनेत्याची नियुक्ती केली आहे. यात फार काही वावगं आहे, असं मला वाटत नाही.

कुणाचे किती नॉट रिचेबल?

विधान परिषद निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबई आणि परिसरातच थांबवून घेतलं आहे. मात्र शिवसेनेचे अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, काल विधान परिषदेचा निकाल लागण्याकरिता खूप उशीर झाला. त्यामुळे आमदारांना रात्री कुठे पाठवायचं म्हणून इथेच मुक्कामी ठेवून घेतलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार रिचेबल आहेत. तर शिवसेनेचे अर्धे रिचेबल आणि अर्धे नॉट रिचेबल आहेत. पण उरलेलेही संपर्कात येतील, अशी शक्यता आहे.