CM Eknath Shinde | शेतकरी भावांनो, तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, मी कासावीस होतो…. हवालदील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भावनिक पत्र

| Updated on: Aug 23, 2022 | 3:52 PM

अति पावसामुळे अवघं पिक नेस्तनाबूत झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक पत्र लिहून आणलं. नुकसानीमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी लिहिलेलं पत्र आज अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलंय.

CM Eknath Shinde | शेतकरी भावांनो, तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, मी कासावीस होतो.... हवालदील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भावनिक पत्र
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शेतकरी भावांनो, तुम्हीच खरी देशाची संपत्ती आहात. तुमचा जीव झाडाला टांगण्याएवढा स्वस्त नाही. शेतकऱ्यानं आत्महत्या (Farmer suicide) केल्याचं ऐकून मी कासावीस होतो. माझ्याच घरातलं कुणी गमावलंय अशी भावना निर्माण होते, अशा शब्दात राज्यातील शेतकरी आत्महत्येविषयीच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विभानसभेत मांडल्या. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा आढावा आज विधानसभेत घेण्यात आला. अति पावसामुळे अवघं पिक नेस्तनाबूत झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक पत्र लिहून आणलं. नुकसानीमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी लिहिलेलं पत्र आज अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलंय.

पत्रातला मजकूर असा….

माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो,

सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र!

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.

परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात… हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं….वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय….

लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे… तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं….’

शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका… आत्महत्या करू नका… मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं….

मी आणि माझं सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना…
चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया!

जय महाराष्ट्र !

आपलाच,

(एकनाथ शिंदे)
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य