होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

| Updated on: Dec 20, 2020 | 2:03 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना कांजूर मार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरही ठाकरे यांनी भाष्य केलं.

होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे
Follow us on

मुबंई: ‘अहंकारी राजा आणि विलासी पूत्र’ अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली जात आहे. कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाच्या मुद्द्यावरुनही महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जातेय. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे,” अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (CM Uddhav Thackeray’s appeal to BJP from Kanjur Marg Metro project)

कांजूर मार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, माजी खासदार किरीट सोमय्या आणि अन्य भाजप नेत्यांकडून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना कांजूर मार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरही ठाकरे यांनी भाष्य केलं.

“आरे मध्ये मेट्रो कारशेड उभारलं असतं तर पुढील 5 वर्षात अजून जागेची गरज भासली असती. तेव्हा अजून मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करावी लागली असती. त्या तुलनेत कांजूर मार्गवरील जागा मोठी आहे. त्या जागेवर मेट्रो 3, मेट्रो 4 आणि मेट्रो 6 या लाईनचं कारशेडही होऊ शकतं. ती जागा गवताळ आणि ओसाड आहे. त्याठिकाणी कारशेड झाल्यास पुढील 50 वर्षांसाठी वाढीव जागेची गरज भासणार नाही”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्याही पलीकडे जात अंबरनाथ आणि बदलापूरसाठीही मेट्रो 14चा विचार करता येऊ शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

चर्चा करु, उद्धव ठाकरेंचं केंद्राला आवाहन

कांजूर मार्गच्या जागेवर राज्य सरकारने मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यावर केंद्राकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ती जागा मिठागराची असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलंय. तसंच काही पर्यावरणवादी आणि खासगी मालकीच्या लोकांनी या जागेवर कारशेड उभारण्यास विरोध केलाय. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे. “केंद्राचे आणि राज्याने एकत्र बसून वाद सोडवला तर जनतेची जागा त्यांच्याच वापरात येईल. मग खेचाखेची का? या बसा आणि चर्चा करा,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पर्यायानं भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे.

हा कद्रुपणा सोडायला हवा- मुख्यमंत्री

कांजूरमार्गच्या जागेवरुन सुरु असलेला वाद राज्याचा आणि जनतेच्या हिताचा नाही. हा कद्रुपणा सोडायला हवा. आम्ही या कामाचं श्रेय तुम्हाला देण्यास तयार आहोत. तुम्ही हा प्रश्न सोडवा, अशी साद मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना घातली आहे. इथे तुमच्या किंवा माझ्या इगोचा प्रश्न नाही. तर जनतेच्या हिताचा मुद्दा असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

विकासकामाला वेळ लागला तरी चालेल, पण त्याचे दुरगामी परिणाम चांगले असावेत. तात्कालिक आणि तकलादू विकासाला अर्थ नाही. भावी पिढ्यांसाठी विकास करायचा असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेल्या संवादात म्हटलं.

संबंधित बातम्या:

सरकार पडलं नाही, पण राजकीय हल्ले परतवत आघाडीने एक वर्षे पूर्ण केलं; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

बीकेसीत मेट्रो कारशेड? ठाकरे सरकारसाठी आजारापेक्षा औषध भयंकर?

CM Uddhav Thackeray’s appeal to BJP from Kanjur Marg Metro project