काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मेगागळती, भाजपमध्ये मेगाभरती नाही : मुख्यमंत्री

| Updated on: Sep 01, 2019 | 11:07 AM

भाजप निवडक लोकांनाच प्रवेश देत आहे. युतीचा विचार करुनच पक्षप्रवेश सुरु राहतील, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मेगागळती, भाजपमध्ये मेगाभरती नाही : मुख्यमंत्री
Follow us on

लातूर : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये (Congress NCP) मेगागळती सुरु आहे, मात्र भाजपमध्ये (BJP) मेगाभरती नाही. ठराविक नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिलं. महाजनादेश यात्रेनिमित्त (Mahajanadesh Yatra in Latur) लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

भाजप तरी निवडक लोकांनाच प्रवेश देत आहे. युतीचा विचार करुनच पक्षप्रवेश सुरु राहतील. एखाद-दुसऱ्या जागेचा प्रश्न निर्माण झाला, तरी आम्ही सोडवू. मात्र तिकीट द्यावे लागतील असे चार जणच घेतले आहेत. फार तर आणखी चार-पाच घेऊ, बाकी तर पक्षात घेतच राहू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मूळ भाजप 97-98 टक्के आहे, घेतलेले लोक 2-3 टक्केच आहेत. त्यामुळे फार फरक पडणार नाही. शक्तीसंचय केलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल शिवसेनेलाच माहिती, आम्ही काय त्यांना घेत नाही, असं म्हणत फडणवीसांनी हात झटकले.

भाजपची मेगाभरती, ‘हे’ दिग्गज पक्षप्रवेश करणार?

काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली, यांच्या पाठीशी उभं राहायला कोणीही तयार नाही. आरशात पाहण्याची वेळ कोणावर आली आहे, ते लोकांना चांगलंच माहिती आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभं रहावं, त्यांना विरोधी पक्षनेता दिसेल, अशी टीका थोरातांनी केली होती.

लातूरचा पाणीप्रश्न निकाली काढणार

परतीचा पाऊस आला नाही, तर लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. उजनीच्या माध्यमातून लातूरच्या पाणीप्रश्नावर कायमचा तोडगा काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आतापर्यंत 1400 कोटींचा निधी दिला असून मे महिन्यापर्यंत दोन टनेलचं काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लातूर आणि उस्मानाबादच्या वॉटरग्रीडचे टेंडर आचारसंहितेच्या आधी काढण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. मराठवाड्यातील प्रत्येक धरण एकमेकांना जोडणार असून कोकणाचं पाणी गोदावरीला देण्यासाठी जल आराखडा तयार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जल परिषदेची मान्यता असून कॅबिनेटची तत्वतः मंजुरी मिळाल्याचंही ते म्हणाले.