मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील सातवा मंत्री ठरला, जाहीर सभेत घोषणा

| Updated on: Oct 17, 2019 | 10:00 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आगामी मंत्रिमंडळतील सातवा मंत्री (CM Devendra Fadnavis ministry ) देखील निश्चित केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील सातवा मंत्री ठरला, जाहीर सभेत घोषणा
Follow us on

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आगामी मंत्रिमंडळतील सातवा मंत्री (CM Devendra Fadnavis ministry ) देखील निश्चित केला आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis ministry) कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना, माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना आणि यवतमाळमध्ये निलय नाईक यांना मंत्री बनवणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी राहुल आहेर, विजय शिवतारे, बाळा भेगडे यांनाही मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी आणखी एका उमेदवाराला मंत्रीपदाचं आश्वासन दिलं. त्यांनी याआधी 6 मंत्र्यांच्या नावाची घोषणा केली, आता सातव्या मंत्र्याच्या नावाचीही घोषणा केली. ते चौफुला (तालुका दौंड) येथे बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले, “महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना 2014 पेक्षा दुप्पट मताधिक्याने विधानसभेत पाठवा. मी त्यांना मंत्री करतो. राहुल कुल यांच्या पाठिशी सरकार भक्कमपणे उभे आहे. त्यामुळे तुम्ही विकासाची काळजी करू नका.” कुल निवडून आल्यानंतर येथील लोकलचा प्रश्न एक वर्षात मार्गी लावतो, असंही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुल यांच्या प्रचारार्थ आज (17 ऑक्टोबर) चौफुला येथे सभा घेतली. फडणवीस म्हणाले, “धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवासींच्या सवलती लागू केल्या आहेत. त्यासाठी 1 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मुळशीचे पाणी आल्यानंतर दौंड, बारामती, इंदापूर तालुक्याचे चित्र बदलणार आहे. बेबी कालव्याच्या विस्तारीकरणासाठी पैसे दिले आहेत. आजची गर्दी पाहून कुल यांचा विजय पक्का आहे.”

काँग्रेसचे राहुल गांधी हे राज्यात सभा घेत आहेत. त्यांची भाषणे इतकी गमतीशीर आहेत की, ते आमच्या प्रचारासाठी येत आहेत की काय असा प्रश्न पडतो, असाही टोमणा फडणवीस यांनी मारला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली.

प्रचारसभेत बोलताना राहुल कुल म्हणाले, “बारामतीच्या मोठ्या झाडाखाली दौंडचे झाड 2014 पर्यंत वाढलेच नाही. दौंडला नेहमी सापत्नपणाची वागणूक दिली गेली. मागील 5 वर्षात 1440 कोटी रूपयांचा विकासनिधी आणला. ही निवडणूक दौंड तालुक्याच्या भवितव्याची आहे. मुळशीचे पाणी, एमआयडीसी, लोकल हे प्रश्न आपण सरकारच्या माध्यमातून सोडवणार आहोत.”

…तर मतेही मागणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षांच्या कार्यकाळापेक्षा गेल्या 5 वर्षात महायुतीच्या सरकारने दुप्पट काम केले नाही, तर जनतेत जाऊन मते सुद्धा मागणार नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन सरकार काम करत आहे. आघाडी सरकारने 15 वर्षात शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये दिले. दुसरीकडे आम्ही 5 वर्षात 50 हजार कोटी रूपये दिले.”

संबंधित बातम्या 

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर    

नातेवाईक vs नातेवाईक | कुठे सख्खे भाऊ, कुठे काका-पुतणे रिंगणात   

नवे आहेत पण छावे आहेत, राजकीय घराण्यांची युवा पिढी मैदानात   

माण विधानसभा : एक भाऊ भाजपात, दुसरा शिवसेनेत; जयकुमार गोरेंसमोर तगडं आव्हान