Eknath Shinde: कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? संजय राऊतांच्या शिवराळ टिकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर

| Updated on: Jul 04, 2022 | 5:23 PM

गुवाहाटीत असताना शिंदे आणि बंडखोर आमदारांनी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. राऊत यांच्या टीकेलाही आज एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Eknath Shinde: कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? संजय राऊतांच्या शिवराळ टिकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर
एकनाथ शिंदे, संजय राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी एकनाथ शिंदे भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार गुवाहाटीतील (Guwahati) हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्यावेळी शिंदे आणि बंडखोर आमदारांनी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. राऊत यांच्या टीकेलाही आज एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

आता कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला?

मी एक मंत्री शेवटी, मला काय माझ्या वरिष्ठांनी कधीही काढलं असतं. पण मी कधीही घाबरलो नाही. काढा काहीही करा. पण माझा जो अजेंडा आहे तो कधीही मी सोडू शकणार नाही. पण काही लोक म्हणत होते, कुणी गटार, कुणी नाल्यातील घाण, कुणी तिकडे माँ कामाख्या देवीला बळी देणार, आता माँ कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? चाळीस रेडे पाठवले. पण माँ कामाख्या बोलली की जो बोललाय तो रेडा नको आम्हाला. सहन करायचीही एक परिसीमा असते. पण सहन करायचीही एक मर्यादा असते, पण काही तोंडातून काढलं नाही. आम्ही बुक्क्याचा मार खाऊन गप्प बसलो. रडत होतो आम्ही, काय किती बदनाम केलं जातंय? आम्ही गद्दार नाही, आमच्या रक्तात गद्दारी नाही, आम्ही उठाव केला, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.

हे सरकार सर्वसामान्यांचं – शिंदे

खालच्या दर्जाचे आरोप केले, कुणी टपरीवाला, कुणी चहावाला, कुणी भाजीवाला, कुणी रिक्षावाला काय काय म्हणाले. पण आम्ही पातळी सोडली नाही. शेवटी मी आपल्याला सांगतो, आम्ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. आमच्या मागे कुठलीही पार्श्वभूमीवर नसताना आज एवढा इतिहास घडलाय. सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? हे सरकार कुणासाठी आहे? हे सरकार साध्या साध्या सगळ्यांसाठी आहे, टपरीवाला, भाजीवाला, रिक्षावाला, शेतकऱ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे सर्वांचं सरकार आहे, असंही शिंदे यांनी आवर्जुन सांगितलं.

संजय राऊतांची नेमकी टीका काय?

26 जून रोजी संजय राऊत यांनी शिवसेना मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला होता. ’40 आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीतून येतील. त्यांना थेट शवागारात पोस्टमार्टेमसाटी पाठवू. गुवाहाटीत एक मंदिर आहे, कामाख्या देवीचं. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही 40 रेडे तिकडे पाठवले आहेत’, अशा शब्दात राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अन्य बंडखोर आमदारांवर टीका केली होती. त्याच टीकेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.