Cm Eknath Shinde : पालघरमधील 50 नगरसेवकांचं एकनाथ शिंदेंना समर्थन, आमदार रवींद्र फाटक यांचा ठाकरेंना जोरदार ‘दे धक्का’

| Updated on: Jul 16, 2022 | 7:14 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रमाण मानून आणि स्वर्गीय आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Cm Eknath Shinde : पालघरमधील 50 नगरसेवकांचं एकनाथ शिंदेंना समर्थन, आमदार रवींद्र फाटक यांचा ठाकरेंना जोरदार दे धक्का
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई :- वसई-विरार महानगरपालिका आणि पालघर पट्ट्यातील (Palghar Shivsena) विविध नगर पंचायतीमधील एकूण 50 नगरसेवकांनी (Shivsena Corporator) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेला ठाणे आणि पालघर पट्ट्यात मोठा फटका बसला आहे. काल समाविष्ट झालेल्या नगरसेवकांमध्ये वसई-विरार महानगरपालिकेतील 5 नगरसेवक, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे 19 नगरसेवक, तलासरी नगर पंचायत समितीतील 5 नगरसेवकानी, मोखाडा नगर पंचायतीच्या 12 नगरसेवकांनी 5 पालघर जिल्हा परिषद सदस्य शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थिती मध्येच या नगरसेवकांनी त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रमाण मानून आणि स्वर्गीय आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुणाचा पाठिंबा देण्याचा निर्णय?

त्यांच्या सोबतच वसई तालुका आणि बाईसर मधील प्रमुख पदाधिकारी तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे आणि बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम आणि वसई विरार मनपाचे स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी, पालघर जिल्हा परिषद कृषी सभापती सुशील चुरी यांनीही शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली आहे.

अनेक विकास प्रकल्प राबवण्याचे जाहीर

यावेळी बोलताना शिंदे यांनी वसई विरार आणि पालघर पट्ट्यातील या नगरसेवकांना त्यांच्या विभागात काम करण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच प्रत्येक गावातील प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करू असेही त्यांना सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून इथे अनेक विकास प्रकल्प राबवण्याचे देखील जाहीर केले. त्यामुळे विकासाचा दृष्टीकोन ठेवून तुम्ही दिलेली साथ वाया जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, माजी पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, आमदार श्रीनिवास वनगा आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे देखील उपस्थित होते.

रवींद्र फाटक हेच पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची हकालपट्टी बेकायदेशीर ठरवून त्यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदावर पुनर्नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी आमदार रवींद्र फाटक यांची देखील पालघर जिल्हाप्रमुख पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. काल 50 नगरसेवकांचा गटाने शिंदे यांना पाठींबा दिला त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी रवींद्र फाटक हेच पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राहतील असे आवर्जून स्पष्ट केले आहे.