CM Eknath Shinde : महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा आणि महाराष्ट्र, मुख्यमंत्रीपदासाठी इतका प्रवास का करावा लागला? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Jul 02, 2022 | 12:15 AM

मुख्यमंत्रीपदासाठी हे सर्व आम्ही केलं नाही. त्यांची अस्तित्वाची लढाई होती. मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र ठरण्यात काही अडचणी असतील आणि ते आमदार असमर्थ ठरत असतील तर त्याचा विचार त्यांनी केलाय, असे उत्तर शिंदे यांनी या प्रश्नावर दिले आहे.

CM Eknath Shinde : महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा आणि महाराष्ट्र, मुख्यमंत्रीपदासाठी इतका प्रवास का करावा लागला? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्रीपदासाठी इतका प्रवास का करावा लागला? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : गुरूवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मुख्यमंत्रिपदी तर देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडला आहे. हे नवं सरकार स्थापन झालं त्या आधीची पॉलिटीकल ड्रामा हा संबंध देशाने पाहिला आहे. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांसह रातोरात गुजरात गाठलं. सुरतमध्ये एक मुक्काम केल्यानंतर या आमदारांना थेट गुवाहाटीत (Guwahati) नेण्यात आलं. त्यानंतर आता आमदार हे गोवा मुक्कामी आहेत. मात्र एवढं सगळी फिरण्याची गरज काय होती? असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. त्याला त्यांनी तसेच थेट उत्तर दिलं आहे. मी पुन्हा सांगतो, मुख्यमंत्रीपदासाठी हे सर्व आम्ही केलं नाही. त्यांची अस्तित्वाची लढाई होती. मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र ठरण्यात काही अडचणी असतील आणि ते आमदार असमर्थ ठरत असतील तर त्याचा विचार त्यांनी केलाय, असे उत्तर शिंदे यांनी या प्रश्नावर दिले आहे.

मविआत काम करण्यास वाव नव्हता

आमची विचारांची भूमिका आम्ही घेतलीय

तसेच मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही भूमिका घेतली नाही. एक साफ, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतलीय. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही भूमिका शिवसेनेला घेता आली नव्हती. जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, त्यातून हे सगळं घडलं आहे, असेही शिंदे म्हणाले आहेत.

भितीपोटी कुणी गेलं नाही

तसेच सर्व आमदार हे स्वेच्छेने माझ्यासोबत आले. त्यांना इतर आमदारांची भूमिका पटली. त्यामुळे ते सहभागी झाले आहेत. जोरजबरदस्तीनं चार लोक येऊ शकतात, 50 लोक कसे येतील. या 50 मधूल काही लोक परत यावे म्हणून खूप प्रयत्न झाले. कोर्टाचा बडगा दाखवला, निलंबनाची भीती दाखवली, आमदारकी जाईल असं सांगितलं गेलं. पण कुणीही गेलं नाही. त्यांनी एकजूट कायम ठेवली. कारण, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यांच्या अस्तित्वाची लढाई ते लढत होते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी खंबिरपणे उभा होतो, असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

निधी कमी पडू नये

तसेच आज जो काही निर्णय झालाय. मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात या 50 लोकांचा सिंहाचा वाटा आहे. मी सांगू इच्छितो, या ५० आमदारांना मागील अडीच वर्षात आलेला अनुभव आता येणार नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघात लोकांना अपेक्षित असलेलं काम, त्यांना हवं असलेलं काम, विकासप्रकल्प यात निधी कमी पडणार नाही, याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून मी घेतलीय, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.