उद्या जनतेनं तुम्हाला आभासी मुख्यमंत्री मानलं तर; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

| Updated on: Oct 17, 2020 | 12:05 PM

उद्धव ठाकरे यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार चालवण्याच्या कार्यपद्धतीवर आता अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. | MNS take a dig on CM Uddhav Thackeray

उद्या जनतेनं तुम्हाला आभासी मुख्यमंत्री मानलं तर; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धव ठाकरे आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत. उद्या जनतेनेही तुम्हाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री न मानता आभासी मुख्यमंत्री मानलं तर, अशी खरमरीत टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना वाटतंय की कुणीतरी आपल्याला दिलासा द्यायला हवा…बरं राज्यातले सगळे नेते फिरत आहेत. सरकार मधले मंत्री फिरत आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी जायला नको का, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. (MNS takes dig on CM Uddhav Thackeray)

यापूर्वी निसर्ग चक्रीवादळानंतर झालेल्या ऑनलाईन बैठकांचा परिणाम काय झाला? निसर्ग वादळ आलेलं त्याची मदत मिळाली का ? प्रत्यक्ष जाऊन बघा ना ! ते कोण करणार शेतकऱ्यांची नुकसान झालं आहे, शासकीय यंत्रणा पंचनामे करीत नाहीये. याचा online आढावा काय घेणार ? अधिकार्यांनी सांगितले की आम्ही पंचनामे केले आणि ते केलेले नसतील तर घरी बसून मुख्यमंत्र्यांना ते कळणार आहे का? आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही राज्याचे नेतृत्व करता, राज्याचे पालकत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही बाहेर पडायला हवं…आता खूप झालं, बस्स झालं, असे देशपांडे यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष या भागांचा दौरा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. परंतु, आतापर्यंत तरी उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच अधिकाऱ्यांशी चर्चा आणि परिस्थितीचा आढावा घेण्यावर भर दिला आहे.

याउलट राष्ट्रवादीचे शरद पवार हे या वयातही राज्यभरात दौरे करत आहेत. शरद पवार हे 18 आणि 19 ऑक्टोबरला मराठवाड्याचा दौरा करतील. या दोन दिवसीय दौऱ्यात शरद पवार तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतील.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बारामतीत दाखल झाले होते. यानंतर ते इंदापूर आणि सोलापूर या भागांचा दौरा करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार चालवण्याच्या कार्यपद्धतीवर आता अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

‘बॉलीवूडसाठी गरजण्यापेक्षा शेतकऱ्यांकडे लक्ष द्या’
उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मुंबईतील बॉलीवूड इंडस्ट्रीला धक्का लागू देणार नाही, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमवीर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा दाखवणारा एक व्हीडिओ ट्विट केला. हे शेतकरी तुमच्या बॉलीवूड कलाकारांसारखे अभिनय करत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बॉलीवूडसाठी गरजण्यापेक्षा शेतकऱ्यांवर शासकीय मदतीचा पाऊस कधी पडेल, याचे उत्तर द्यावे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर

प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार मदतीची मागणी, आता मुख्यमंत्री आहात, तातडीने मदत करा : राजू शेट्टी

(MNS takes dig on CM Uddhav Thackeray)