Uddhav Thackeray : ‘कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, सगळ्यांवर माझं लक्ष’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारांना सूचनावजा इशारा

| Updated on: Jun 06, 2022 | 10:32 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, तुमच्या सगळ्यांवर माझं लक्ष आहे, असा सूचनावजा इशाराच उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलाय.

Uddhav Thackeray : कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, सगळ्यांवर माझं लक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारांना सूचनावजा इशारा
शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरेंच्या सूचना
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उतरल्यामुळे निवडणूक होत आहे. 10 जून रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना (Shivsena) आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यासाठी नाराज आमदारांना फोनाफोनी आणि गुप्त भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, तुमच्या सगळ्यांवर माझं लक्ष आहे, असा सूचनावजा इशाराच उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलाय.

कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तुमच्या सगळ्यांवर माझं लक्ष आहे. शिवसेनेला निवडणूक जिंकायचीच आहे. कुणावरही संशय आल्यास वरिष्ठांना कळवा. कट्टर शिवसैनिकाला निवडणुकीत विजय मिळवून द्यायचा आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना सूचना दिल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेचे सर्व आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर आणि चहापाणी झाल्यानंतर या सर्व आमदारांना दोन बसमधून पवईच्या हॉटेल रिट्रिटमध्ये मुक्कामासाठी नेण्यात आलंय. त्यानंतर मंगळवारी त्यांना हॉटेल ट्रायडंटमध्ये मुक्कामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

‘कोणताही घोडा विक्रीला नाही त्यामुळे बाजाराचा प्रश्नच नाही’

घोडेबाजाराची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्याबाबत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना विचारलं असता, पक्षाचे आमदार, अपक्ष आमदार आणि मदत करणारे आमदार सर्व सोबत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे त्याचं 100 टक्के पालन होईल. वरीष्ठ नेते आता जी रणनिती ठरवतील त्यानुसार सगळं घडेल, असं आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. सत्तार यांनाही घोडेबाजाराच्या चर्चेबाबत विचारलं असता कोणताही घोडा विक्रीलाच नाही तर बाजाराचा प्रश्नच नाही, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडूंचं दबावतंत्र

धान उत्पादक शेतकरी आणि हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारनं हात वर केले आहेत. मला वाटतं आता भाजपसह सर्व नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर दबाव आणला पाहिजे. शरद पवार असो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो, त्यांनी मोदींवर दबाव आणावा. जर केंद्र सरकार मानायला तरायच नसेल तर मग राज्य सरकारने तरी हेक्टरी 4 हजार रुपये अनुदान द्यायला हवं, अशी आमची मागणी आहे. मी मतदान महाविकास आघाडीलाच करणार आहे. कारण मी आघाडीत मंत्री आहे. पण शेवटच्या पाच मिनिटात करणार, सुरुवातीला नाही करणार, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.

आमदार रवी राणांचा मोठा दावा

दरम्यान, आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. राज्यसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना आमदारांवर विश्वास आहे का? शिवसेनेच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये देखरेखीखाली ठेवावं लागतं. शिवसेनेचे आमदार आपल्यासोबत आहेत की नाही असा प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पडलाय. अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी मंत्र्यांना टक्केवारी द्यावी लागते हे केलेलं वक्तव्य प्रत्येकाच्या ओठांवरचं आहे. जसे अपक्ष आमदार नाराज आहेत, तसेच शिवसेनेचे आमदारही नाराज आहेत. ते उद्धव ठाकरेंना मोठा झटका देतील, असा दावा रवी राणा यांनी केलाय.