मुख्यमंत्र्यांच्या काळाकुट्ट सावलीने महाराष्ट्र झाकोळला : अशोक चव्हाण

| Updated on: Sep 03, 2019 | 8:06 AM

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या अशोकाचं झाड संबोधत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच महाजनादेश यात्रेवरही सडकून टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या काळाकुट्ट सावलीने महाराष्ट्र झाकोळला : अशोक चव्हाण
Follow us on

नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांनी महाराष्ट्राला कोणती सावली दिली हे सांगावं. त्यांच्या काळात राज्यात फक्त नैराश्याची काळी छाया पसरली. पाच वर्षांत त्यांनी काय दिवे लावले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, अशा शब्दात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर (Devendra Fadnavis) हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोकाचं झाड (Ashoka Tree) उंचच उंच वाढतं, मात्र त्यापासून कुणालाच सावली मिळत नाही, अशी टीका होती.

अशोक चव्हाण यांनी मुखमंत्री फडणवीसांसह त्यांच्या जनादेश यात्रेवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा उपयोग नांदेडमधील गुन्हेगारांना अटक करण्यासाठी केला असता, तर जनतेने त्यांचं अधिक कौतुक केलं असतं. नांदेडमध्ये डॉक्टरांकडून खंडणी गोळा करणारे कुख्यात गुन्हेगार आहेत. कोकुलवार यांच्यावर गोळीबार झाला. ते अपंग झाले आहेत. त्यांच्या मुलाला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी काही लोकांना अटक केल्याचा दावा केला आहे. मात्र, गोळीबारानंतर देखील त्या व्यक्तीच्या मुलाला धमकी येते. प्रत्यक्षात ज्याने हल्ला केला आहे त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. मुख्यमंत्री नांदेडमध्ये महाजनादेश यात्रेला येतात, मात्र त्यावर काहीही बोलत नाही.”

नांदेडमधील गुन्हेगारांच्या पाठीशी कोण आहेत? ते त्यांच्या गुन्ह्याचे रॅकेट कोठून चालवतात? हे जगजाहीर आहे. गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत. शहरातील खासगी शिकवण्यांकडून खंडणी मागितली जात आहे. खंडणी दिली नाही, तर मारण्याची धमकी दिली जाते. अगदी नगरसेवकांना देखील धमकी दिली जाते. हे सर्व सुरू आहे. मात्र, राज्याच्या पोलीस यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या राजकीय दौऱ्यात काही अडथळा येऊ नये याकडेच लक्ष देत आहे. त्यांना आरोपी मोकाट आहेत, गुन्हे घडत आहेत, याचं काही नाही, असंही चव्हाण यांनी नमूद केलं.