वंचित आघाडीला रोखण्यासाठी काँग्रेसचा मेगाप्लॅन

| Updated on: Sep 03, 2019 | 2:45 PM

येत्या निवडणुकीत राज्यात वंचित आघाडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी काँग्रसने नवा मेगाप्लॅन तयार केला आहे.

वंचित आघाडीला रोखण्यासाठी काँग्रेसचा मेगाप्लॅन
Follow us on

नागपूर : विधानसभा निवडणुका (Assembly election) तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या निवडणुकीत राज्यात वंचित आघाडीमुळे (vanchit bahujan aghadi)  होणारे नुकसान कमी करण्यासाठी काँग्रसने नवा मेगाप्लॅन (Congress Mega Plan) तयार केला आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बहुजन समाज पक्षाशी (बसप) आघाडी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बसप (Congress NCP BSP) एकत्रित येऊन लढणार असल्याचे दिसत आहे.

यंदाच्या निवडणुकीसाठी दलित मतदारांची मन वळवण्यासाठी काँग्रेसमार्फत अभियान राबवणार आहे. दलित मतदारांसाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रात ‘संविधान ते स्वाभिमान’ हे अभियान राबवण्यात येणार असून आहे. या अभियानातंर्गत वंचितकडे गेलेल्या दलित मतदारांची मनं काँग्रेसकडे वळवण्याची मोहीम सुरु केली आहे.

विधानसभेसाठी काँग्रेसने उमेदवारांचे मुलाखतीची सुरुवात केली आहे. तसेच उमेदवारांच्या निवडीसाठी काँग्रेसने 3 सर्व्हे केले आहेत. या सर्व उमेदवारांना निवडून येण्याच्या निकषावरच काँग्रेस उमेदवारी देणार असल्याचे बोललं जात आहे.

तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर तयारी सुरु केली आहे. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत मतांचं झालेलं विभाजन पाहता वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. राज्यातील 10 ते 12 जागांवर काँग्रेसचा उमेदवार जेवढ्या फरकाने पराभूत झाला, त्यापेक्षा जास्त मतं वंचितच्या उमेदवाराने घेतली होती. याचा फटका काँग्रेसला बसला आणि लोकसभेला राज्यात फक्त एकच जागा जिंकता आली. यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसकडून वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सोबत घेण्याचा अटोकाट प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. वंचितने काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर देऊन आघाडीमध्ये न जाण्याबाबतची भूमिका अप्रत्यक्षपणे स्पष्ट केल्याचं बोललं जातंय. त्यातच सर्व जागांसाठी मुलाखती म्हणजे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही वंचितेन स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्याशिवाय जर काँग्रेससोबत राष्ट्रवादी नसेल तरच आघाडी करणार असल्याची अशक्यप्राय अटही वंचितने ठेवली आहे.