तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकली तरी लोकांना तुरुंगात डांबता आणि आम्हाला प्रवचन देताय; काँग्रेसचा भाजपवर पलटवार

| Updated on: Oct 26, 2020 | 7:37 PM

भारतीय जनता पक्षाची जी लोक आहेत ती 'उलटा चोर कोतवाल को डाटे' अशा पद्धतीचा कारभार करत आहेत. | Sachin Sawant

तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकली तरी लोकांना तुरुंगात डांबता आणि आम्हाला प्रवचन देताय; काँग्रेसचा भाजपवर पलटवार
Follow us on

मुंबई: सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली तरी भाजपकडून लोकांना तुरुंगात डांबले जाते. आता तोच भाजप आम्हाला स्वातंत्र्याविषयी प्रवचन देत असल्याचा पलटवार काँग्रेसकडून करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमवारी महाराष्ट्रात स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे वक्तव्य केले होते. या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पक्षाची जी लोक आहेत ती ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशा पद्धतीचा कारभार करत असल्याचे त्यांनी म्हटले. (Sachin Sawant slams BJP president JP Nadda)

गेल्या सहा वर्षात पत्रकारांवर ज्या पद्धतीचा दबाव आणण्यात आला, त्याविषयी लोकांना माहिती आहे. पंतप्रधानांनी पत्रकारांना बाजारू म्हटल्याचेही देशाने ऐकले आहे. देशात जवळपास 233 लोकांवर देशद्रोहाचा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पत्रकारांवरील हल्ल्यातही वाढ झाली आहे. केवळ सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकल्यानंतर लोकांना जेलमध्ये टाकणारे हे सरकार आहे आणि आता ते प्रवचन देतात हे आश्चर्यच वाटते, असा टोला सचिन सावंत यांनी जे.पी. नड्डा यांना लगावला.

यावेळी सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचेही समर्थन केले. महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भिन्न विचारसरणीचे पक्ष आहेत. ही बाब आम्हाला मान्य आहे. परंतु भाजप हा लोकशाहीसाठी कशा पद्धतीने मारक ठरला आहे आणि लोकशाहीसमोरचे संकट आपल्याला दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपच सत्तेवर येऊ नये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा विकास साधता यावा यासाठी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’च्या आधारावर आम्ही सरकार स्थापन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे तो त्यांचा प्रश्न असल्याचे सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते जे.पी. नड्डा?

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार काम करण्यापलीकडे सर्वकाही करत आहे. राज्यातील लोकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. ही काँग्रेसची ट्रेडमार्क स्टाईल असल्याची टीका जे.पी. नड्डा यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही: नवाब मलिक

आमचं हिंदुत्व म्हणजे त्वचा, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी पांघरलेली शाल- आशिष शेलार

सावरकर हे आमचे हिंदुत्वाचे मार्गदर्शकच; शिवसेना कधीही गप्प बसणार नाही : संजय राऊत

(Sachin Sawant slams BJP president JP Nadda)