साध्वी प्रज्ञासिंगचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा, कोर्टाने याचिका फेटाळली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना दिलासा मिळालाय. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, या मागणीसाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज बॉम्ब ब्लास्टमध्ये मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाने केला. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळला. त्यामुळे साध्वीचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई […]

साध्वी प्रज्ञासिंगचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा, कोर्टाने याचिका फेटाळली
Follow us on

मुंबई : भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना दिलासा मिळालाय. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, या मागणीसाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज बॉम्ब ब्लास्टमध्ये मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाने केला. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळला. त्यामुळे साध्वीचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई सेशन कोर्टात यावर सविस्तर सुनावणी झाली.

प्रज्ञासिंगविरोधात निसार अहमद यांनी अर्ज केला होता. त्यांच्या वकील चैताली सेठ यांनी युक्तिवाद केला. “15 तारखेला साध्वीची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून ती सतत नॅशनल मीडियावर दिसत आहे. आम्ही तिच्या निवडणूक लढवण्याचा हक्काच्या विरोधात नाही. पण साध्वीने आपली तब्येत ठिक नाही, आपण चालू-फिरू शकत नाही, कँसर आहे, असं सांगून जामीन मिळवला. कोर्टाला खोटं सांगितलं आहे, कोर्टाची फसवणूक केली. मात्र आता ती फिरताना, प्रचार करताना दिसत आहे,” असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडून करण्यात आला.

अर्जकर्ते निसार अहमद यांचा कोणत्याही पार्टीशी संबंध नसल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. मात्र, यावेळी न्यायाधीश विनोद पडाळकर यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. साध्वी विरोधातील अर्जकर्त्यांच्या निवेदनावर सही नव्हती, तसंच साध्वीने जो रिप्लाय फाईल केला आहे, त्यावर साध्वीची सही नव्हती. या कृतीवर न्यायाधीश नाराज होते.

यानंतर साध्वीचे वकील जे पी मिश्रा यांनी युक्तिवाद केला. त्यांचं म्हणणं होतं की, “साध्वी खरंच आजारी आहे . इतर अनेक लोक आजारी आहेत. ते देखील ट्रायल फेस करत आहेत. त्यांच्या बाबत तक्रारदार काही बोलत नाहीत. यांचा मुद्दा आहे, साध्वी आजारी असल्याचा बहाणा करून एनआयएसमोर हजेरी द्यायला टाळते. मात्र, साध्वीला एनआयएने हजेरीसाठी कधी बोलावलंच नाही. साध्वीने या कोर्टाकडे आजारी असल्याने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. तो अर्ज कोर्टाने फेटाळला. मात्र, त्यानंतर तिला मेरिटवर बेल मिळाला. 2016 ला साध्वीची तब्येत बरी नव्हती. तेव्हा ती हलू, फिरू शकत नव्हती. मात्र, जामिनावर सुटल्यावर तिने बंगलोर येथील आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले. आता तब्येत बरी आहे. साध्वी ही विचारसरणीसाठी निवडणूक लढत आहे,” असा युक्तिवाद साध्वीच्या वकिलाकडून करण्यात आला.

साध्वीला निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालावी हे या कोर्टाच्या अधिकारात येत नाही. हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येतो, असं म्हणत कोर्टाने साध्वीच्या विरोधातील याचिका फेटाळली.

या निकालाने साध्वीला मोठा दिलासा मिळाला आहे. 23 एप्रिल रोजी भोपाळ येथे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. साध्वीने आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला आहे. मात्र, कोर्टाचा काय निकाल येईल हे कुणीच सांगू शकत नाही. यामुळे काळजीचा भाग म्हणून भाजपच्या वतीने आणखी एका डमी उमेदवाराचा फॉर्म भरण्याची तयारी भाजपने केली होती. मात्र, साध्वी विरोधातील अर्जच फेटाळण्यात आल्याने तिचा निडवणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.