‘कुणाची हंडी कोण फोडेल हे जनताच ठरवेल’, अनिल परबांचं फडणवीसांना उत्तर; एकनाथ शिंदेंवरही निशाणा

| Updated on: Aug 19, 2022 | 6:44 PM

देवेंद्र फडणवीस यांनी आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु, असं फडणवीस म्हणाले. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय.

कुणाची हंडी कोण फोडेल हे जनताच ठरवेल, अनिल परबांचं फडणवीसांना उत्तर; एकनाथ शिंदेंवरही निशाणा
अनिल परब यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मुंबईत दहीहंडी उत्सावाचा (Dahi Handi Festival) जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय. विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी आपल्या भागात दहीहंडीचं आयोजन केलंय. त्यात अनेक सेलिब्रिटी गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थिती नोंदवत आहेत. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकेतील कलाकारांचाही त्यात समावेश आहे. गोविंदा पथकातील गोविंदाही हंडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेही दहीहंडी उत्सवात राजकीय रंग उधळताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु, असं फडणवीस म्हणाले. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी प्रत्युत्तर दिलंय.

परबांचं फडणवीसांना उत्तर, शिंदेंना टोला

फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, कुणाची हंडी कोण फोडेल हे जनताच ठरवेल. आमची दहीहंडी ही वेगळी असते. त्यांची दहीहंडी कोणती आहे ते माहिती नाही. निवडणुकीत कळेल, असा इशारा परब यांनी दिलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात सहभागी होत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. दीड महिन्यापूर्वी आम्हीही 50 थरांची हंडी फोडली असं शिंदे म्हणाले. त्यावर ‘मी अजूनपर्यंत 8 आणि 9 थरांची दहीहंडी पाहिली आहे. 50 थरांची दहीहंडी मी पहिल्यांदाच ऐकतेय. बहुदा ते स्पेनला गेले असतील, असा टोला परब यांनी लगावलाय.

‘आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय’

भाजप नेते प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणेतील दहीहंडी उत्सवाला फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘आता आपलं सरकार आहे. आपलं सरकार आल्यानंतर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवही उत्साहात साजरा होणार. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की गोविंदा आता खेळाडू असतील. दहीहंडी हा साहसी खेळ आहे. खेळाडूंना मिळणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. कुणी जखमी झालं तर सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय, असं फडणवीस म्हणाले.