“पर्यटनापेक्षा आरोग्य खातं मोठं”, सामनातील टीकेला दीपक केसरकांचं उत्तर

| Updated on: Aug 15, 2022 | 12:30 PM

महाविकास आघाडी असताना जी खाती शिवसेनेकडे होती तीच खाती आम्हाला मिळाली आहेत. उलट आरोग्य खात्यासारखं एक मोठं खातं आम्हाला मिळालं आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

पर्यटनापेक्षा आरोग्य खातं मोठं, सामनातील टीकेला दीपक केसरकांचं उत्तर
Follow us on

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी असताना जी खाती शिवसेनेकडे होती तीच खाती आम्हाला मिळाली आहेत. उलट आरोग्य खात्यासारखं एक मोठं खातं आम्हाला मिळालं आहे . पर्यटनापेक्षा आरोग्य खातं मोठं आहे. मोठं खातं येत असताना एखाद छोटं खात सोडावं लागतं. सामनामधून टिका करण्यापेक्षा त्यावेळेला जर अधिक जोर केला असता तर चांगली चांगली खाती शिवसेनेच्या वाट्याला आली असती. या सरकारमध्ये तीच खाती आमच्या वाट्याला आली असती, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटलंय. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री होते. त्यांच्याकडे पर्यंटन खातं होतं. त्यावरून केसरकरांनी टोला लगावला आहे. “भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी. भाजपने डाव साधलाय. महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदेगटाला कमी महत्वाची खाती दिली”, असं टिकास्त्र सामनातून शिंदे गटावर डागण्यात आलं. त्याला केसरकरांनी उत्तर दिलंय.

गुलाबराव पाटील म्हणाले…

सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, असं राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. “खातं कुणाला कोणतं आलं, त्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी सरकारची असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे”, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर नव्या सरकारचं खाते वाटप झालं.  माझं पूर्वीचंच पाणीपुरवठा खातं मला मिळालं. त्यामुळे आनंद झाला आहे. माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्यानं जलजीवन मिशन अंतर्गत 34 हजार गावांना पाणी पुरवण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे.  गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद आहे, असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.