नवी दिल्ली: तब्बल 36 दिवस उलटून गेले तरी अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याचीच सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. मात्र, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असं मोघम उत्तर दिलं जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारवरही बोट ठेवलं जात आहे. ठाकरे सरकारने 32 दिवस पाच मंत्र्यांचं सरकार चालवलं होतं. आम्हीही लवकरच विस्तार करू, असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडून वेळ मारून नेली जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान आलं आहे. आम्ही येत्या 15 ऑगस्टच्या आत नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) करू, असं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? की चार दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हा माझा शब्द आहे, असं मुख्यमंत्र्यांनी विधान केलं होतं. त्याप्रमाणेच फडणवीस यांचं हे विधानही हवेत उरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे ओबीसी अधिवेशनासाठी दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. अजितदादांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलावंच लागेल. कारण ते विरोधी पक्षनेते आहेत. पण ते विसरतात त्यांचं पाचच जणांचं मंत्रिमंडळ 30-32 दिवस होतं. ते बोलत आहेत पण आम्ही लवकर करू. तुम्हाला वाटतं त्या आधी विस्तार करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीच संबंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कोर्टाने मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे काही निर्देश दिलेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला वाटतं की ओबीसी समाज मोठा समाज आहे. देशाच्या मुख्यप्रवाहात त्यांना आणण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केला आम्ही महाराष्ट्रात प्रयत्न केला. समस्या योग्य आहे. नोकऱ्यात आणि शिक्षणात जास्तीत जास्त लोकांना सामावून घेतलं पाहिजे. देशाच्या इतिहासात सर्वाधिक ओबीसी मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विक्रम मोदींनी केला. पंतप्रधानांना जात नसते. पण मोदी ओबीसी आहेत हा योगायोग आहे. त्यांना सर्व समस्यांची जाण आहे. त्यांच्या नेतृत्वात निस्चित ओबसींच्या कल्याणासाठी आम्ही काम करू, असंही त्यांनी सांगितलं.
ओबीसींचे नेते तायवाडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र आणलं. ज्या 22 मागण्या इथे मांडल्या, माझ्या क्षमतेनुसार या मागण्या संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार. मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र मंत्रालय केलंय. मी मुख्यमंत्री असताना ओबीसी हिताचे 22 निर्णय झाले. अजूनही ओबीसींसाठी अपेक्षित निर्णय घेणार. मी म्हटलं होतं 15 दिवसात ओबीसींना आरक्षण देऊ, ते दिलं, असं ते म्हणाले.
मी आज राजकारणात गेल्या 30 वर्षांपासून आहे. माझ्या मतदारसंघात बहुसंख्य ओबीसी आहे. ओबीसी समाजानेच देवेंद्र फडणवीस यांना नेता बनवलं, असंही ते म्हणाले.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 ते 16 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. फडणवीस यांना गृहखाते मिळणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.