कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलुप ठोकली जातेय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

| Updated on: Jul 04, 2021 | 6:45 PM

सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अधिवेशनात संसदीय आयुधे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. (Devendra Fadnavis)

कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलुप ठोकली जातेय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
Devendra Fadnavis
Follow us on

मुंबई: सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अधिवेशनात संसदीय आयुधे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने लोकशाहीला कुलुप ठोकण्याचं काम केलं आहे, असं सांगतानाच अधिवेशनात आम्हाला आमचे मुद्देच मांडता येत नसतील तर आम्ही जनतेच्या फोरममध्ये आमचे प्रश्न मांडू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Devendra Fadnavis address media talking about maharashtra assembly monsoon session)

उद्या सोमवारी राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याबद्दल आघाडी सरकारवर टीका केली आहे. सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. तसेच दोन दिवसात कोणतेही संसदीय आयुधे न वापरण्यास सांगितलं आहे. म्हणजे सदस्यांनी 35 दिवस टाकलेले त्यांचे प्रश्न व्यापगत होणार आहेत. सर्व प्रश्न निरस्त केले गेले आहेत. त्यामुळे उत्तरे मिळणार नाहीत. पूर्वी अधिवेशनाचा कालावधी कमी झाला तरी लेखी उत्तर मिळायचे. आता ते मिळणार नाही. उत्तरं का मिळणार नाहीत? अधिकारी काय माश्या मारायला आहेत का?, असा सवाल करतानाच अधिकाऱ्यांना मोकळं रान करून दिलं आहे. प्रश्नच विचारायला कुणी नसल्याने अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायला मोकळं रान करून दिलं आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

आमच्याकडे शंभरपेक्षा अधिक विषय

आमच्याकडे शंभरपेक्षा अधिक विषय आहेत. पण आम्हाला बोलण्यासाठी आयुधचं ठेवलेलं नाही. 60 वर्षात जे घडलं नाही ते आता घडत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोविडच्या नावावर लोकशाहीला कुलुप लावण्याचं काम करण्यात आलं आहे, असं ते म्हणाले.

सरकारचा अधिवेशनातून पळ

आम्हाला जेवढे प्रश्न सभागृहात मांडता येईल तेवढे मांडूच. पण सभागृहात प्रश्न मांडता येत नसेल तर आम्ही माध्यमांसमोर येऊन प्रश्न मांडू. रस्त्यावर उतरू, जनतेच्या फोरममध्ये जाऊ आणि प्रश्न लावून धरू. उद्या जर आंदोलन झालं, तर आंदोलन करतोय म्हणून आम्हाला बोलू नका, असंही ते म्हणाले. आम्ही सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू या भीतीने सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही

अधिवेशन दोन दिवसांचं आहे. आघाडीतील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी समन्वय नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं चित्रं दिसत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संसद-राज्याच्या अधिवेशनाची तुलना

यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिवेशनाची तुलना केली. राज्य सरकारचे सात अधिवेशने झाली आहे. त्यांच्या अधिवेशनाचा कालवधी 38 दिवसांचा राहिला आहे. उद्याचं अधिवेशन हे आठवं अधिवेशन आहे. त्यामुळे या आठ अधिवेशनाचा कालावधी सरासरी पाच दिवसांचा राहिला आहे. कोविडच्या काळात महाराष्ट्राने 14 दिवसांचं अधिवेशन घेतलं. तर संसदेने 69 दिवसांचं अधिवेशन घेतलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis address media talking about maharashtra assembly monsoon session)

 

संबंधित बातम्या:

‘आक्रोश’ दाबण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाज झुकणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सरकारला ठणकावले

कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील: राऊत

आज सांगून मोर्चा काढला, उद्या न सांगता मोर्चा काढू, मग पाहू काय होते ते; नरेंद्र पाटलांचा इशारा

(Devendra Fadnavis address media talking about maharashtra assembly monsoon session)