Devendra Fadnavis : ‘शिवसेनेच्या काळात संभाजीनगरमध्ये पाण्याचा सत्यानाश’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात; भाजपच्या ‘जल आक्रोशा’ला सुरुवात

| Updated on: May 23, 2022 | 5:30 PM

इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला, त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis : शिवसेनेच्या काळात संभाजीनगरमध्ये पाण्याचा सत्यानाश, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात; भाजपच्या जल आक्रोशाला सुरुवात
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचा औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चा
Image Credit source: TV9
Follow us on

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा एकदा पाणी प्रश्न (Water Crisis) पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत ‘जल आक्रोश मोर्चा’ काढला जातोय. भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले आहेत. हंडा हातात घेऊन महिला कार्यकर्त्या शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला, त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याच्या जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत. इथे पाणीच नाही. मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मी मुख्यमंत्री असताना जी योजना मंजूर केली आणि 1600 कोटी दिले. त्यात बदल करुन 600 कोटी महापालिकेने द्यावे असा निर्णय या सरकारनं केला. महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसा नाही. पण एक नवा पैसा दिला नाही. केंद्राचा पैसा इकडे वळवला. त्या योजनेचा ठेकेदार काम करत नाही. अर्धा किमी कामही झालेलं नाही. 40 किमी काम करायचं आहे, 25 वर्षे लागतील अशा स्पीडने काम सुरु आहे. म्हणूनच आज संभाजीनगर भाजपकडून जलआक्रोश मोर्चा आम्ही काढत आहोत. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही लढा देऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय.

नाना पटोलेंनाही फडणवीसांचं प्रत्युत्तर

दरम्यान, नाना पटोले यांनी नागपुरातही पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचा आरोप केलाय. त्याबाबत विचारलं असता फडणवीसांनी पटोले यांच्यावरही टीका केली. नाना पटोले रोज खोटं बोलत आहेत. मनात येईल ते बोलतात. त्यामुळे अशा व्यक्तीला उत्तर देण्याचं कारण नाही. 24 तास पाणीपुरवठा करण्याचा राष्ट्रीय पुरस्कार नागपूरला मिळाला आहे हे नाना पटोलेंना माहिती नाही, असं फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नौटंकीने पाणी मिळणार असेल तर आम्हीही सहभागी होऊ – जलील

शहराची पाणी पट्टी कमी करून आणि हंडा मोर्चासारखी नौटंकी करून औरंगाबादकरांना खरच पाणी मिळणार असेल तर मीसुद्धा मोर्चात सहभागी होईन, अशी संतप्त प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. शिवसेनेने मागील २५-३० वर्षांपासूनच्या पाणी समस्येवर काहीही उपाय केला नाही, असा आरोप भाजपने केला आहे. तर शिवसेनेप्रमाणे भाजपदेखील सत्तेत होती, तेव्हा हा प्रश्न दिसला नाही, असा सवाल करत शिवसेना भाजपाला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आता एमआयएमनेही दोन्ही पक्षांना चांगलेच सुनावले आहे.