Devendra Fadnavis : ‘औरंगाबादची पाण्याची समस्या संपणार नाही, तोवर सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही’, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

| Updated on: May 23, 2022 | 8:25 PM

'मुख्यमंत्री म्हणतात मी संभाजीनगर म्हणतो तर समजून जा. मला असं वाटतं आता पाणी मगायला गेलं तर काय म्हणतील... 'दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा', कारण ते म्हणतात मी म्हणेल ती काळ्या दगडावरची काळी रेघ आहे', अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं.

Devendra Fadnavis : औरंगाबादची पाण्याची समस्या संपणार नाही, तोवर सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Image Credit source: TV9
Follow us on

औरंगाबाद : पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरुन औरंगाबाद (Aurangabad) शहरात जोरदार राजकारण सुरु झालंय. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपनं जल आक्रोश मोर्चा काढला. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. ‘मुख्यमंत्री म्हणतात मी संभाजीनगर म्हणतो तर समजून जा. मला असं वाटतं आता पाणी मगायला गेलं तर काय म्हणतील… ‘दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा’, कारण ते म्हणतात मी म्हणेल ती काळ्या दगडावरची काळी रेघ आहे’, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र डागलं. भाजपच्या जल आक्रोश मोर्चाला हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते, नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या. हातात रिकाम्या घागरी, हंडे घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी त्राहीमाम सुरु’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘संभाजीनगरच्या इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा असेल तर तो आजचा मोर्चा असेल. एका पत्रकाराने मला आठवण करुन दिली. आमचे नेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वात याच रस्त्यावरुन एक मोर्चा काढला होता. तेव्हा आम्ही सांगितलं होतं सत्ता परिवर्तन अटळ आहे आणि सत्तापरीवर्तन झालं. आजचा मोर्चा सत्ता परिवर्तनासाठी नाही तर आजची लढाई ही भ्रष्ट व्यवस्था परिवर्तनाची आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात जी भ्रष्टाचारी व्यवस्था उभी राहिली आहे ती संपवण्यासाठी आज हा मोर्चा आहे. हा मोर्टा जनतेचा आहे, त्यांचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटित करण्याचं काम भाजपनं केलं. ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी त्राहीमाम चालला आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसतोय, त्यावेळी भाजप शांत बसणार नाही. मी इशारा देतो ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचेल त्याच वेळी हा संघर्ष संपेल. तोवर आम्ही तुम्हाला स्वस्थ झोपू देणार नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

हंडा घेऊन पाणी मागणाऱ्या आजीच्या घरी तुम्ही कधी जाणार?

मुख्यमंत्री म्हणतात मी संभाजीनगर म्हणतो तर समजून जा. मला असं वाटतं आता पाणी मगायला गेलं तर काय म्हणतील? ‘दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा’, कारण ते म्हणतात मी म्हणेल ती काळ्या दगडावरची काळी रेघ आहे. या बेईमानांच्या बेईमानीमुळे संभाजीनगरला तहाणलेलं ठेवलं आहे. आमच्या मोर्चाला किती अटी टाकल्या. पण हा जनसैलाब आहे, याला तुम्ही रोखू शकणार नाहीत. आमचे शिवसेनेचे मित्र पोस्टर फाडत होते. तुम्ही पोस्टर फाडू शकता पण हा आक्रोश मोडू शकत नाही. ज्यावेळी सात सात दिवस नळातून केवळ हवा येते. त्यावेळी माझी माय माऊली मनात तुम्हाला शिव्या शाप देतेय. ते शिव्या शाप तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. आज तर ऐंशी वर्षाची आजी हंडा घेऊन मोर्चात होती. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, जी आजी त्यांच्या घरासमोर होती तिच्या घरी गेलात. पण या हंडा घेऊन पाणी मागणाऱ्या आजीच्या घरी तुम्ही कधी जाणार आहात? तिच्या व्यथा तुम्ही कधी समजून घेणार आहात का? असा सवालही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केलाय.

समांतर योजनेतील भ्रष्टाचारावरुन फडणवीसांचं टीकास्त्र

‘आम्ही पाण्यासाठी समांतर योजना आणली. सगळी योजना यांनी खाऊन टाकली होती. मी मुख्यमंत्री झाल्यावर चार चार बैठका घेतल्या. दोन अडीच महिने मेहनत केल्यावर लक्षात आलं यातून पाणी येणार नाही. जसं राजाचा पोपट मेल्यानंतर कुणी सांगत नव्हतं, तसं या राजाचा हा पोपट आता मेलाय. आता नवीन योजना केल्याशिवाय पर्याय नाही. मी सांगितलं योजना तयार करा, ती करताना 2050 पर्यंत संभाजीनगरचा विस्तार लक्षात घेऊन ती तयार करा. आपण योजना तयार केली, तिला मान्यता दिली. 600 कोटी महापालिकेला द्यावे लागणार होते. आमच्याकडे सावे साहेब आले, म्हणाले महापालिकेकडे खायलाही पैसा नाही. मी म्हणालो ठीक आहे, महापालिकेनं एक रुपया द्यावा आम्ही सर्व पैसे देतो. दुर्दैवानं सरकार बदललं, मग वाटाघाटी सुरु झाल्या. सहा महिन्यांनी टेंडर दिलं गेलं. योग्यवेळी ते दिलं गेलं असतं तर आजपर्यंत 25 किमी लाईन पूर्ण झाली असती आणि पुढच्या दीड दोन वर्षात संभाजीनगरला पाणी मिळालं असतं’, अशी खंतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

‘मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि MMRDAशिवाय काहीच माहिती नाही’

‘संभाजीनगरच्या पाण्यासाठी स्वत:चा एक पैसा यांनी दिला नाही. केंद्राचा पैसा वळवला. बाळासाहेबांचं किती प्रेम या संभाजीनगरवर होतं. पण आजच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि एमएमआरडीएशिवाय काहीच माहिती नाही. आज ज्या गतीनं हे काम चाललं आहे त्यानुसार पुढची 25 वर्षे हे काम होत नाही. कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. जो जो जनतेविरोधात जाईल, त्याला ही जनता खाली खेचल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला पहिली संधी मिळणार आहे महापालिका निवडणुकीत. ही महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. रस्त्याच्या कामासाठी मी सव्वाशे कोटी दिले, पण ते ही हे खर्च करु शकले नाहीत. संभाजीनगरला आम्ही जे दिलं त्या तुलनेत एक फुटकी कवडी हे सरकार देत नाही’, अशी टीकाही त्यांनी केलीय.

‘आम्ही सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही’

‘मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारनं पाडला. मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुडदा पाडला. समुद्रात वाहून जाणारं पाणी बोगद्याद्वारे गोदावरीत आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आपण करत होतो, त्याला यांनी स्थगिती दिली. हे सरकार पाण्यासाठी त्राहीमाम करावं लागणारं आहे. आज संभाजीनगरने महाविकास आघाडीला हलवून टाकलं आहे. जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही तोवर भाजप झोपणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही. आताही या सरकारची कुंभकर्णी झोप उडाली नाही तर या सरकारला कुणीही वाचवू शकत नाही. या जनतेच्या त्रासाला, त्रागाला तुम्ही वाट मोकळी करून दिली. पाणी आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही’, असा इशाराच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिलाय.