Devendra Fadnavis : पंकजा मुंडे विधान परिषद निवडणूक लढवणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात ‘आमचा पूर्ण पाठिंबा…’

| Updated on: May 27, 2022 | 10:34 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनीही पंकजा मुंडे यांच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलंय. मात्र, याबाबतचा निर्णय पंकजाताई आणि आमचे हायकमांड घेतील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय

Devendra Fadnavis : पंकजा मुंडे विधान परिषद निवडणूक लढवणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात आमचा पूर्ण पाठिंबा...
पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : राज्यात राज्यसभेपाठोपाठ आता विधान परिषदेचीही निवडणूक (MLC Election) जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. अशावेळी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मी विधान परिषदेवर जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारलं असता त्यांनीही पंकजा मुंडे यांच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलंय. मात्र, याबाबतचा निर्णय पंकजाताई आणि आमचे हायकमांड घेतील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्यावरुन फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

पंकजा मुंडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, त्यांची नाराजी वगैरे नाही. पंकजाताई या आमच्या सिनियर नेत्या आहेत. ज्यावेळी एखादी निवडणूक येते तेव्हा त्यांचं नाव चर्चेत येणं साहाजिकच आहे. त्यात काही वावगंही नाही. कारण कुठल्याही पदासाठी त्या पात्रच आहेत. त्यासंदर्भातील निर्णय त्यांना आणि आमच्या हायकमांडला करायचा आहे. आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्ण सकारात्मकता आहे, काहीच अडचण नाही. ते आणि आमचं हायकमांड मिळून याबाबत निर्णय घेतील, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

‘संभाजी महाराजांची कोंडी करण्यात आली’

छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. त्याबाबत विचारल्यानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘संभाजी महाराजांची कोंडी करण्यात आली. पहिल्यांदा पवारसाहेबांना माहिती होतं की यावेळची जागा त्यांच्याकडे नाही. त्यांच्या कराराप्रमाणे ती शिवसेनेकडे आहे. तरी त्यांनी जाणिवपूर्वक आम्ही संभाजीराजेंना पाठिंबा देऊ, आमची अधिकची मतं त्यांना देऊ, असं सांगून एक चित्र निर्माण केलं. त्यानंतर सांगितलं अरे आमच्याकडे तर जागाच नाही, ती शिवसेनेकडे आहे. आम्ही शिवसेनेला सांगू. मग शिवसेनेनं सांगितलं की हो आम्ही संभाजीराजेंना मदत करायला तयार आहोत. संभाजीराजेंनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी कुठल्याही पक्षाकडून लढणार नाही, मला सगळ्यांनी पांठिंबा द्यावा. पण त्यांच्याशी चर्चा करु बाहेर मात्र बातम्या सोडल्या की, 12 वाजता संभाजीराजे शिवबंधन बांधण्यासाठी येणार. त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा फोन उचलला नाही. माझाही उचलला नव्हता, तसा संभाजीराजेंचाही त्यांनी उचलला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे काही नवीन घडलेलं नाही. दरवेळी हे असंच वागतात. त्यानंतर शिवसेनेकडून व्हिक्टिम कार्ड प्ले केलं जातं’, अशी टीका फडणवीस यांनी केलीय.

हे सुद्धा वाचा

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘मात्र, संभाजीराजेंची कोंडी ठरवून करण्यात आली हे आता स्पष्ट झालं आहे. म्हणूनच ही बाब संभाजीराजेंनी स्पष्ट केलीय. जेव्हा मला संभाजीराजे भेटायला आले होते तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं होतं की सगळे मला समर्थन देतील, तुम्हीही मला समर्थन द्या. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की सगळे तयार असतील तर मीही आमच्या हायकमांडशी बोलेन. पण त्यानंत काय घडलं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे’.

‘नेते श्रद्धाळू झाले तर कार्यकर्तेही श्रद्धाळू होतील’

शरद पवार यांनी आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. मांसाहार केल्यानं पवार मंदिरात गेले नाहीत. त्यांनी बाहेरूनच बाप्पाला हात जोडले. याबाबत विचारलं असता, अंधश्रद्धा वाढू नये, पण समाज हा श्रद्धाळू असला पाहिजे. त्यामुळे नेते श्रद्धाळू झाले तर त्यांना मानणारे इतर कार्यकर्तेही श्रद्धाळू होतील. त्यामुळे मला असं वाटतं चांगली सुरुवात आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय.