मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 15, 2020 | 5:10 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं (Devendra Fadnavis said We have not demanded the resignation of the CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us on

पुणे : भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, “भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं (Devendra Fadnavis said We have not demanded the resignation of the CM Uddhav Thackeray).

देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पुढच्या काही महिन्यांमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाकडून फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. दरम्यान, सध्या बिहार सरकारकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर निशाणा साधला जात आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी रोखठोक भूमिका मांडली (Devendra Fadnavis said We have not demanded the resignation of the CM Uddhav Thackeray).

“मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मी पाच वर्ष राज्याच्या पोलिसांबरोबर काम केले. त्यांची क्षमता मला माहिती आहे. मात्र अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करु नये, अशी आमची अपेक्षा आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“सुशांत प्रकरण सीबीआय’कडे पाठवण्याची मागणी झाली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल. मात्र महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तमच आहेत”, असं फडणवीस यांनी मत मांडलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या टीकेवरुन महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. या विषयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “पार्थ पवारांचा विषय पवार कुटुंबियांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या कारभाराचं विश्लेषण करायची ही वेळ नाही. मात्र सरकारने कारभार नीट चालवावा. त्यांच्यात अंतर्गत मोठ्या प्रमाणात भांडण सुरु आहे. सरकारमध्ये नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. मात्र बदल्या संदर्भात अनाकलनीय सुरु आहे. जे ऐकायला मिळते ते भयंकर आहे. राज्याच्या डीजेने चुकीच्या बदल्या करायला लावल्यावर मी करणार नाही. वेळप्रसंगी मी नोकरी सोडतो, असं म्हटलंय हे अत्यंत गंभीर आहे,” असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कोरोना संकटावरही भाष्य केलं. “कोरोना संकट सुरु होऊन पाच महिने होत आली. आपण आता लसीची वाट पाहतोय. कोरोनावर लस येईपर्यंत काळजी घ्यावी लागेल. पुण्यात पत्रकारांसाठी कोव्हिड सेंटरची निर्मिती केली आहे. पत्रकार लॉकडाऊन काळात फिल्डवर काम करत होते. त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांना योग्य उपचार मिळावे हे महत्त्वाचं, ते काम हे सेंटर करत आहे. महाराष्ट्र दुर्दैवानं कोरोनाची राजधानी झाला आहे. देशातील एकूण मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यू राज्यात होतात, हे गंभीर आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मृत्यू दर आणि बाधा रोखली तर आपण बाहेर पडू. कोरोना टेस्ट वाढवण्याची गरज आहे. आता टेस्ट वाढत आहेत. आपण अँटिजन टेस्ट करतोय. पण त्याची विश्वासर्हता कमी आहे, त्यामुळे पीसीआरटी टेस्ट वाढवावी”, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“कोरोनाच्या काळात आरएसएसने चांगलं काम केलंय. कोरोना संकटाचा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रांवर मोठा परिणाम झाला. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार आपण आत्मनिर्भर बनूया. आणि या कोरोनापासून स्वातंत्र्य मिळावं ही शुभेच्छा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.