गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Nov 18, 2020 | 5:55 PM

"काँग्रेसला मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ज्या गुपकर आघाडीत सामील झाले आहेत त्याचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?", असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला (Devendra Fadnavis slams Congress on Gupkar alliance).

गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : “जम्मू-काश्मीमध्ये भारतविरोधी शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करुन तिथे पुन्हा एकदा  कलम 370 लागू झाला पाहिजे, अशाप्रकारचा प्रयत्न करत आहेत. तिथे पुन्हा कलम 370 लागू व्हावं, यासाठी तेथील अनेक पक्षांचं एकत्रिकरण झालं आहे. या गुपकर आघाडीत काँग्रेसदेखील सहभागी झाली आहे. काँग्रेसला मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ज्या आघाडीत सामील झाले आहेत त्याचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?”, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे (Devendra Fadnavis slams Congress on Gupkar alliance).

“नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांचा अजेंडा हा चीनच्या मदतीने कलम 370 पुन्हा लागू करण्याचा आहे. ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते असे नेते चीनच्या मदतीने कलम 370 लागू करण्याबाबत भाष्य करतात, याचं मला आश्चर्य वाटतं. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती राष्ट्रीय झेंडा काश्मीरमध्ये लागू देणार नाही, अशाप्रकारचे वक्तव्य करतात. अशा लोकांच्या आघाडीत काँग्रेस सहभागी होत असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारु. देशासमोर काँग्रेसला उघडं पाडण्याचं काम करु”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“काश्मीरमध्ये पीडीपी जोपर्यंत आमच्यासोबत होती तोपर्यंत भारताच्या तिरंगाचा अपमान करण्याची त्यांची हिंमत झाली नाही. आता ते तिरंग्याचा अपमान करत असाताना काँग्रेस त्यांच्यासोबत जात आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावर उत्तर द्यावं”, असंदेखील फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis slams Congress on Gupkar alliance).

“पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हा 70 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या संघर्षानंतर रद्द करण्यात आलं. जम्मू-काश्मीर, लडाखचं पूर्ण विलगीकरण करण्यात आलं. आता तेथील जनजीवन पूर्वपदावर आलं आहे.  त्याठिकाणी आज कुठलाही भारतीय गुंतवणुकदार गुंतवणूक करु शकतो. प्रचंड बांधकाम त्याभागात सुरु झाले आहे”, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

राष्ट्रीय मुद्दयावर बोलतोय, देशात कलम 370 लागू होणार नाही म्हणजे नाही : देवेंद्र फडणवीस