केवळ मालपाणी कमवण्याकरता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आले : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jan 05, 2020 | 4:35 PM

नागपूर झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कांद्री मनसूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

केवळ मालपाणी कमवण्याकरता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आले : देवेंद्र फडणवीस
Follow us on

नागपूर : ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आजही मारामारी सुरु आहे (Devendra Fadnavis slams Maha Vikas Aghadi government). कुणी राजीनामा देत आहे तर कुणी घरी बसतंय तर कुणी ऑफिस फोडतंय. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. गरिब, शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणंदेणं नाही. केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र आले आहेत. कसा डल्ला मारता येईल? याचा प्रयत्न यांचा सुरु आहे’, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला (Devendra Fadnavis slams Maha Vikas Aghadi government).

नागपूर झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कांद्री मनसूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. ‘कर्जमाफीबाबत लोकांना बुद्धू बनवणारा जीआर सरकारने काढला. जीआरमध्ये सांगितलं 2015 ते 2019 च्या मध्येच कर्ज घेतलेलं पाहिजे. कर्ज सप्टेंबर 2019 पूर्वी थकीत असलं पाहिजे. केवळ पीक कर्ज माफ होईल, मुदत कर्ज माफ होणार नाही. अल्प मुदत कर्ज माफ होणार नाही. एकप्रकारे शेतकऱ्याला कर्जमाफीचं आश्वासन देऊन मूर्ख बनवण्याचं काम या लोकांनी केलं’, अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी टीका केली.

‘शेतकरी अडचणीत आला ऑक्टोबर 2019 मध्ये आणि सांगितलं सप्टेंबर 2019 आधी जे कर्ज थकीत असेल त्यालाच केवळ कर्जमाफी मिळेल. याचा अर्थ असा की, ऑक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे बाधित 60 ते 70 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची मदत मिळणार नाही, अशाप्रकारे या सरकारचं विश्वासघाताची मालिका सुरु आहे’, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली. ‘विधानसभा निवडणुकीला दोन पक्ष एकत्रित येतात, एकत्र निवडून येतात, घरोबा करतात, संसार थाटतात. त्यातला एक पक्ष पळून जातो आणि हारलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत नव्याने सरकार थाटतो, त्याठिकाणी घरोबा तयार करतो आणि नव्यानं सरकार स्थापन करतो. हे देशाच्या इतिहासातील पहिलं उदाहरण आहे की, ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांना सोडून दिलं आणि जे हारले आहेत त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्तेच्या लाचारीकरता सरकार तयार झालं’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.