Devendra Fadnavis : मुख्यमंत्री कोण? फडणवीसांना कानोकान खबर नव्हती, शिंदेंना माहीत होतं? वाचा बातमी मागची बातमी

| Updated on: Jul 01, 2022 | 2:00 PM

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री कुणाला करायचं, याबाबतचा निर्णय हा पूर्णपणे दिल्लीतून अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी घेतलेला होता, अशीही समोर येतेय.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री कोण? फडणवीसांना कानोकान खबर नव्हती, शिंदेंना माहीत होतं? वाचा बातमी मागची बातमी
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) आमदारांना घेऊन गोव्याला जातात, एकटेच मुंबईत येतात, देवेंद्र फडणीवासांना भेटतात, त्यानंतर पत्रकार परिषद होते. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे (Devendra Fadnavis) यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करतात. सगळे शॉक होतात. खरा धक्का पुढेच असतो. फडणवीस स्वतः मंत्रिमंडळात नसणार, हेही स्पष्ट करतात. दुसरा धक्का पत्रकारांना बसतो. त्यानंतर आणखी एक धक्का बसायचा बाकी असतो. शपथविधीच्या काही मिनिटं आधी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असा वरुन आदेश येतो. हा आदेश फडणवीसांनाही टाळता येत नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये इतके ट्वीस्ट आणि टर्न्स (Maharashtra Politics) आहेत, याची कल्पना एकनाथ शिंदे यांना नव्हती अशातला भाग नाही. झालंही तेच. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताच चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवला. भाजपच्या गोटात जल्लोष, आनंदी वातावरण होतं. पण 24 तासांच्या आतच माहौल इतका पालटेल, याची पुसटशीही कल्पना भाजपमधील लोकांना कशी नव्हती, अशीही चर्चा आता रंगतेय.

ही चर्चा आता जरी सुरु झालेली असली, तरी देखील एकनाथ शिंदे यांना याबाबत पूर्ण कल्पना होती. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपने शिंदे यांना सातत्यानं संपर्कात ठेवलं होतं, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं एका वृत्तातून दिली आहे. मुख्यमंत्रिपदाचाच शब्द घेऊन शिंदे गोव्यातून मुंबईत आले होते.

हे सुद्धा वाचा

वाटलं एक, घडलं भलतंच

बंडखोरीच्या काळात खरंतर देवेंद्र फडणवीस हे दोनदा दिल्लीला जाऊन आले. त्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. पण या घडामोडींमध्ये नेमकं घडतंय काय, याची कोणतीच माहिती पुढे येऊ शकली नव्हती. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस समर्थकांकडून अभिनंदाचा वर्षाव होण्यात सुरुवात झालेली होती. देवेंद्र फडणवीसच आता मुख्यमंत्री होतील, असा विश्वास प्रत्येकाला वाटत होता.

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री कुणाला करायचं, याबाबतचा निर्णय हा पूर्णपणे दिल्लीतून अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी घेतलेला होता, अशीही समोर येतेय. सूत्रांच्या हवाल्यानं याबाबतची माहिती दिलीय. त्यामुळे जेपी नड्डा आणि अमित शाह यांनी पुढे येत, फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचं केलेलं आवाहनही न टाळता येण्यासारखंच होतं. हा एका राजकीय खेळीचा भाग होता, असंही जाणकार सांगतात.

जातीचं समीकरण?

यामागेच एक जातीचं समीकरण आहे, असंही सांगितलं जातं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतला गेलाय. महाराष्ट्रात 3 टक्के जनत ब्राह्मण तर 30 टक्के जनता मराठा आहे. फडणवीसांच्या काळात भाजपने मराठा आरक्षणाचा एक अभूतपूर्व लढा पाहिला होता. ही बाब भाजपला लक्षात होती. शिवाय एका ब्राह्मण नेत्याला मुख्यमंत्री करणं, हे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीसाठी एक आयतं कोलीत हातात दिल्यासारखं होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती.

फडणवीस यांनी अल्पावधीत राज्यातील पक्षात मोठी ताकद मिळवली होती. ही गोष्ट दिल्लीपासूनही लपून राहिलेली नव्हती. 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांचं राजकारण कुणापासूनच लपून राहिलेलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वासू नेता म्हणूनही फडणवीसांकडे पाहिलं गेलं.

फडणवीसांना लवकर केंद्रात संधी?

फडणवीसांची केलेली उपमुख्यमंत्रीपदाची नेमणूक ही भाजपने केलेली दूरगामी तरतूद आहे, अशीही शक्यता वर्तवली जाते. दोघा ज्येष्ठ नेत्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितनुसार, फडणवीसांना भविष्यात केंद्रात काम करण्यासाठी संधी दिली जाऊ शकतो, असंही सांगितलं जातंय. आताच्या राजकीय घडामोडींकडे क्षणिक अर्थ जरी काढले जात असले, तरी भविष्याच्या दृष्टीने विचारपूर्वक घेतलेला हा भाजपचा निर्णय आहे, असंही जाणकार सांगतात.