Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, कामकाजालाही सुरुवात; सचिवांच्या बैठकांचं सत्र

आज फडणवीसांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच फडणवीस यांनी कामकाजालाही सुरुवात केलीय. सचिवांच्या बैठका घेतल्या. तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही एक बैठक घेत त्यांनी पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, कामकाजालाही सुरुवात; सचिवांच्या बैठकांचं सत्र
देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला
Image Credit source: ANI
Reporter Rahul Zori | Edited By: sagar joshi | Updated on: Jul 01, 2022 | 5:29 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. गुरुवारी शपथविधी पार पडल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा (Deputy CM) पदभार स्वीकारलाय. शपथविधीनंतर गुरुवारी संध्याकाळीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयात पोहोचले आणि त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यावेळी राज्यातील पावसाची स्थिती आणि पेरणीचा आढावा घेतला. त्यानंतर आज फडणवीसांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच फडणवीस यांनी कामकाजालाही सुरुवात केलीय. सचिवांच्या बैठका घेतल्या. तसंच ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरही एक बैठक घेत त्यांनी पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

ओबीसी आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले. प्रवीण दरेकर,डॉ. संजय कुटे,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते, अशी माहिती फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिलीय.

माझा राग मुंबईकरांवर काढू नका – उद्धव ठाकरे

कदाचित आज पहिल्यांदाच माझा चेहरा पडलेला तुम्हाला दिसत असेल. कारण आज दु:ख झालंय ते एका गोष्टीचं. माझ्यावर राग आहे ना, मग तो माझ्यावर काढा. माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईकरांवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो एक प्रस्ताव आम्ही दिलेला आहे, त्यात कुठेही अहंकार नाही. मी मुंबईकरांच्यावतीनं हात जोडून त्यांना विनंती करतो की आपला आरेचा जो आग्रह आहे तो रेटू नका. कारण मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहोचेल, अशा शब्दात आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या प्रस्तावावरुन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

उद्धवजींचा मान राखून…

उद्धव ठाकरेंच्या या टीकेबाबत फडणवीस यांना विचारलं असता, असं आहे की याबाबत आता आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. पण मला असं वाटतं की उद्धवजींचा पूर्ण मान राखून कारशेडबाबत मुंबईकरांचं हित हेच आहे की जिथे कारशेड 25 टक्के तयार झालंयत तिथेच ते 100 टक्के तयार व्हावं. कारण त्याला सुप्रीम कोर्टाची मान्यता आहे, असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

Follow Us