Devendra Fadnavis : आरेत एकही झाड कापणार नाही, कांजूरचा आग्रह केवळ इगोसाठी; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

| Updated on: Aug 12, 2022 | 8:11 AM

Devendra Fadnavis : मला असं वाटतंय की त्यांनी (उद्धव ठाकरे) फक्त इगो करता कांजूर मार्ग धरून ठेवला. मेट्रो कार शेड करिता आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे 29 टक्के काम पूर्ण झालं आहे. तर एकूण प्रकल्पाचा 85 टक्के काम पूर्ण झालंय.

Devendra Fadnavis : आरेत एकही झाड कापणार नाही, कांजूरचा आग्रह केवळ इगोसाठी; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: आरे कारशेडच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आमनेसामने ठाकले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मूळात आरेमध्ये एकही झाड कापायचे नसताना कांजूरचा आग्रह धरण्याचं कारणच नव्हतं. आरेतील काम बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. असं असतानाही केवळ इगोसाठीच कांजूरचा आग्रह धरण्यात आला होता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आरे कॉलनीत कारशेडसाठी (aarey car shed) एकही झाड कापणार नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला आहे. नागपूर येथे आले असता ते मीडियाशी बोलत होते. यापूर्वीही फडणवीस यांनी ठाकरेंवर कांजूर मार्गचा निर्णय अहंकारातून घेतल्याची टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आता देवेंद्र फडणवीस यांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्याचा वाद असल्याने तो प्रकरण हायकोर्टात सुरू आहे. मेट्रो कारशेडची जागा मेट्रो थ्री करिता मागितलेली आहे. तर कांजूर मार्गची जागा मेट्रो सिक्ससाठी मागितली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो थ्रीसाठी योग्य नाही हे आमच्या काळातल्या कमिटीने तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या हाय लेवल कमिटीनेही अहवालात स्पष्ट केलं आहे. कार शेड आरेमध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्गमध्ये नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षाचा उशीर होईल, असं ठाकरे यांनी नेमलेल्या समितीनेच म्हटल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जनतेचे पैसे वाया जाऊ देणार नाही

मला असं वाटतंय की त्यांनी (उद्धव ठाकरे) फक्त इगो करता कांजूर मार्ग धरून ठेवला. मेट्रो कार शेड करिता आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे 29 टक्के काम पूर्ण झालं आहे. तर एकूण प्रकल्पाचा 85 टक्के काम पूर्ण झालंय. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील पैसे आहेत आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

काळजी करू नका, खातेवाटप होईल

यावेळी त्यांनी खाते वाटपावरही भाष्य केलं. खाते वाटप लवकरच होईल. काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. तोवर तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खाते वाटप करत आहात. आम्ही पेपर फोडून टाकलं तर तुम्हाला काम नाही मिळणार, असा चिमटा त्यांनी मीडियाला काढला.