सुप्रियाताई अभिनंदन, दिग्विजय सिंह यांच्या शुभेच्छा

| Updated on: Nov 24, 2019 | 10:50 AM

शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला. सुप्रिया सुळे अभिनंदन, अशा आशयाचं ट्वीट दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

सुप्रियाताई अभिनंदन, दिग्विजय सिंह यांच्या शुभेच्छा
Follow us on

नवी दिल्ली : अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. अशावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना शरद पवारांचा राजकीय वारसदार ठरवण्याची घाई (Digvijay Singh on Supriya Sule) लागली आहे.

‘राष्ट्रवादीचे 54 पैकी 53 आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. अजित पवार एकटे पडतील. शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला. सुप्रिया सुळे अभिनंदन’ अशा आशयाचं ट्वीट दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

शरद पवार यांचे राजकीय वारसदार अजित पवार की सुप्रिया सुळे हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं मोघम उत्तर बऱ्याचदा दिलं जातं. अजित पवारांच्या आग्रहामुळे निवडणुकीत उतरलेले त्यांचे पुत्र पार्थ पवार पडले. तर शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी राजकारणात दमदार एन्ट्री घेतली. त्यामुळे रोहित पवारांचं नावही वारसदारांच्या शर्यतीत घेतलं जातं. यामुळे अजित पवार बिथरल्याचीही चर्चा आहे.

अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना भुलवून त्यांनी राजभवनावर नेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. छगन भुजबळ यांनी 50 आमदार आपल्यासोबत असल्याची माहिती दिली आहे.

सत्तेच्या अग्निपथावर पुढे काय?

शनिवारी (23 नोव्हेंबर) अचानक झालेल्या या सत्तानाट्याच्या वैधतेला दोन पातळीवर आव्हान असणार आहे. एक आव्हान विधीमंडळाच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्याचे आहे. तर दुसरे आव्हान सर्वोच्च न्यायालयात.

राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराची ‘घरवापसी’, संख्याबळ किती?

राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे हे बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून जोरदार फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.

दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपला बहुमत चाचणीत पराभूत करु, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. यापुढील काळात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून साम, दाम, दंड, भेद यांचा उपयोग करुन आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप (Digvijay Singh on Supriya Sule) केला जात आहे.