गुवाहाटी: शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गुवाहाटीत महत्त्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेते जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय या बैठकीत आरपारचे निर्णय घेण्यात येणार असल्यानेच शिंदे यांनी त्यांच्या विश्वासू लोकांना बैठकीपासून लांब ठेवल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाकडून आरपारचे कोणते निर्णय घेतले जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. या बैठकीत कायदेशीर बाबी, प्रहारमध्ये विलीन होणे, भाजपमध्ये (bjp) विलीन होणे, राज्यपालांना नवा गट स्थापन केल्याचं पत्रं देणे यासह भाजपसोबत गेल्यास सत्तेचा फॉर्म्युला काय असेल आणि कुणाला कोणती पदं द्यायची यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांची बंडखोरांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून ही बैठक सुरू आहे. बैठकीतून एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू लोकांनाही बाहेर ठेवण्यात आले आहेत. फक्त मंत्री आणि अमदारांनाच बैठकीत घेतल्याची माहिती आहे. ही अत्यंत गोपनीय बैठक असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे रुग्णालयातून आले आहेत. ते आजपासून सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यपालांकडे पत्रव्यवहार करण्याबाबतचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीत कायदेशीर बाबींवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. उपसभापती नरहरी झिरवळ यांनी त्यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबतचा आक्षेप फेटाळून लावला आहे. तसेच 16 आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. गटनेतेपदी अजय चौधरीच असण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासमोर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यातून काय मार्ग काढायचा यावर या बैठकीत चर्चा केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
या बैठकीत वेगळा गट स्थापन करायचा की प्रहार किंवा भाजपमध्ये प्रवेश करायचा याबाबतचा निर्णयही घेण्यात येणार आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे वेगळा गट स्थापन करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबतची चर्चा या बैठकीत होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात परतण्यावरही या बैठकीत चर्चा सुरू आहे. कुणीही घाबरू नका. सर्वांची सुरक्षा केली जाईल. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची सर्वांना सुरक्षा असणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरू नका, असं शिंदे यांनी या आमदारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.