Eknath Shinde : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, भाजप नेते स्वागताला, सत्ता स्थापनेसाठीचा प्लॅन काय?

| Updated on: Jun 30, 2022 | 3:03 PM

शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. ते आधी सागर बंगल्यावर जाणार आहेत. तिथे ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, भाजप नेते स्वागताला, सत्ता स्थापनेसाठीचा प्लॅन काय?
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुंबईमध्ये (mumbai) दाखल झाले आहेत. ते आधी सागर बंगल्यावर जाणार आहेत. तिथे ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करून ते सत्ता स्थापनेबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. दरम्यान गोव्याहून मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. उद्धव ठाकरे यांच्याबाबत कायम आदर आहे. पूर्वीही होता आणि यापुढेही असणार आहे. मात्र शिवसेनेचे हे जे आमदार आहेत, ते ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत तेथील लोकांची इच्छा भाजप -शिवसेना युती व्हावी अशीच आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला याचा आम्हाला आनंद झाला असे नाही तर वाईटच वाटत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

शिंदे यांना मुंबईत दाखल झाल्यानंतर होणारा राजकीय विरोध पहाता एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. फडणवीस यांच्यांशी चर्चा झाल्यानंतर राज्यापालांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाच्या जल्लोषावर आक्षेप

दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर बंडखोर आमदारांनी देखील जल्लोष केला अशा काही बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचे आम्हालापण दु:ख आहे. मात्र विचारासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर कोणीही जल्लोष केला नसल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषावर देखील केसरकर यांनी आक्षेप घेतला आहे.  आमचे बंड हे पक्ष प्रमुखांविरोधात नव्हते तर ते राष्ट्रवादी, काँग्रेस विरोधात होते. त्यामुळे अशा पद्धतीने जल्लोष चुकीचा असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.