Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर ‘मनसे’ची खलबतं, ठाणे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी? बैठकीत काय दडलंय? जाणून घ्या…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि मविआ सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तर दुसरीकडे शिवतीर्थवर मनसेची बैठक झाल्याची देखील माहिती आहे. यावरुन मनसे अधिक सक्रिय झाल्याचं दिसतंय.
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेला (Maharashtra Political Crisis) वेग आलाय. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्याकीय वर्तुळातील हलचाली वाढल्या असून कधीही नवं सरकार सत्तेवर येऊ शकतं, अशी शक्यताय. हे सगळं होत असताना मनसे (MNS) नेते देखील सक्रिय झाल्याचं दिसतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तर दुसरीकडे शिवतीर्थवर मनसेची बैठक झाल्याची देखील माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून मनसेनं वाढवलेली सक्रियता अनेक शक्यता निर्माण करतेय. या शक्यता नेमक्या काय आहेत, मनसेनं बैठक का बोलावली होती. ते जाणून घेऊया…
मनसेनं बैठक का बोलावली?
उद्धव ठाकरेंच्या राजीनामान्यानंतर आज शिवतीर्थावर मनसेची बैठक पार पडली. विशेष म्हणजे राज्यातील घडामोडींवर चर्चा झाली. आजच्या बैठकीला बाळा नांदगावकर, अविनाश जाधव उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. मनसेनं आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ठाणे आणि मुंबईतील घडामोडींवर चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
फोन पे चर्चा नेमकी कशावर?
एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात काही दिवसांपूर्वी फोनवरुन चर्चा झाली होती. ही चर्चा नेमकी कशाची होती, ते कळू शकलं नाही. दरम्यान, राज्यातील राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्या मौनाकडे शंकेच्या नजरेनं देखील पाहिलं गेलं. शिवसेनेत फुट पडतेय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आहेत, शिवसेनेवरील ठाकरेंचा ताबा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तरीही राज ठाकरे शांत कसे? अशी चर्चा दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. तर दुसरीकडे शिंदे यांच्यासोबत ‘फोन पे चर्चा’ वरुन वेगळंच चित्र असल्याचं बोललं गेलं. दरम्यान, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते सक्रिय झालेत. त्यानुसार महापालिका आणि नवं सरकारच्या विषयावर तर शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये फोन नव्हता ना, अशीही शक्यत वर्तवली जातेय.
‘मविआ’वर टीका, ‘भाजप’सोबत गट्टी?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं. तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठकारे यांनी अनेकदा महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं होतं. दरम्यान, भाजपसोबत मनसेचं चांगलं जमतं, असंही अनेकदा बोललं गेलंय. शिंदेंसोबत असलेले संबंध, फडणवीस आणि पर्यायाणे भाजपवर देखील राज ठाकरेंनी कधीही थेट टीका केलेली नाही. त्यामुळे आता नवं सरकार आल्यावर काय होणार, हे पाहावं लागले. दरम्यान, मनसेच्या मनात काय, ते येत्या काळातच कळेल.