मोठी बातमी: आमदार फोडले, आता पक्ष हायजॅक करण्याची तयारी, Eknath Shinde गट सांगणार धनुष्य बाणावरच दावा?

| Updated on: Jun 23, 2022 | 12:08 PM

एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षावरच दावा ठोकला तर शिवसेनेनं संपूर्ण अस्तित्वच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. इतिहासात पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची एवढी मोठी पडझड होत आहे, असंही सांगितलं जातंय. 

मोठी बातमी: आमदार फोडले, आता पक्ष हायजॅक करण्याची तयारी, Eknath Shinde गट सांगणार धनुष्य बाणावरच दावा?
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातील सत्ता गमावण्याची नामुष्की शिवसेनेवर आल्यानंतर आता पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपद (Maharashtra Chief minister) जाणार यावर काही तासात शिक्कामोर्तब होईल. पण त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे ठाकरेंची शिवसेनाच पूर्णपणे हायजॅक करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. आज सकाळी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे चार आमदार गुवाहटीत पोहोचले. आता एवढे आमदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षच हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच ते दावा ठोकणार असल्याचं बोललं जात आहे. असं झालं तर शिवसेनेनं संपूर्ण अस्तित्वच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. इतिहासात पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची एवढी मोठी पडझड होत आहे, असंही सांगितलं जातंय.

धनुष्यबाणावर दावा ठोकणार?

एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्रातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार झाले आहेत. सध्याच्या घडीला जवळपास 41 आमदार गुवाहटीत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर शिवसेनेकडे फक्त 14 आमदार शिल्लक आहेत. सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे हे आम्हीच खरी शिवसेना आहोत. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उरलेली नाही, असं ठामपणे सांगत आले आहेत. आता हाच धागा पकडत त्यांनी थेट धनुष्यबाणावर दावा ठोकण्याची तयारी केली असून पुढील काही वेळात निवडणूक आयोगाकडे रितसर मागणीही केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे राजीनाम्याच्या तयारीत?

शिवसेनेतील 41 आमदार शिंदे गटात गेल्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षच कोलमडून पडल्याची स्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील मुख्य सचिवांची एक बैठक आज वर्षा बंगल्यावर बोलावली आहे. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल या बैठकीत आभार मानले जातील, असंही बोललं जात आहे. कालच्या फेसबुक लाईव्हमधील भाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. आपलं राजीनामा पत्र तयार असल्याचं सांगितलं. तसंच आज मुख्य सचिवांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सत्तेचं गणित काय सांगतं?

बंडानंतर एकनाथ शिंदे गट मजबूत!

  • एकनाथ शिंदे – 47
  • भाजप – 106
  • अपक्ष – 13
  • एकूण – 166

बंडानंतरची महाविकास आघाडीची अवस्था

  • शिवसेना – 14
  • राष्ट्रवादी – 53
  • काँग्रेस – 44
  • अपक्ष – 10
  • एकूण – 121