Eknath Shinde: मोठी बातमी ! एकनाथ शिंदे सायंकाळी मंत्रीपदाचा राजीनामा देणार, नेमकी रणनिती काय?

| Updated on: Jun 21, 2022 | 4:37 PM

महाराष्ट्रातील अस्थिर झालेल्या सरकारला पाडण्यासाठी भाजपातील राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वानंही जोर लावला आहे. भाजप नेते अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या आमदारांच्या ताफ्यासह गांधीनगर येथे बोलावलं आहे. त्यांच्यासाठी 3 चार्टर विमानं आणि 14 फॉर्चुनर गाड्यांचा ताफा तैनात ठेवण्यात आला आहे.

Eknath Shinde: मोठी बातमी ! एकनाथ शिंदे सायंकाळी मंत्रीपदाचा राजीनामा देणार, नेमकी रणनिती काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः एका रात्रीतून तीन पक्षांच्या महाविकास आघाडी  (Mahavikas aghadi)सरकारला वेठीस धरणारे शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज संध्याकाळपर्यंत मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यावरून शिवसेना चहुबाजूंनी घेरली गेली असतानाच ही नवी माहिती समोर आली आहे. राज्यातील 30 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन बंडखोरी करणारे मंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रीपदाचा राजीनामा (Shinde Will Resign) दिला तर महाराष्ट्रात खरोखरच राजकीय भूकंप होऊ शकतो. कारण शिंदेंनी मंत्रीपदाचा राजीनामा देणं म्हणजे शिवसेनेवरची नाराजी आणखी तीव्रपणे व्यक्त करणं. याचाच अर्थ शिवसेनेनं केलेली शिष्टाई परिणामकारक ठरली नाही आणि कुठल्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार धोक्यात येऊ शकतं, असं बोललं जात आहे.

उद्धव ठाकरेंचे दूत अपयशी ठरणार?

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांच्या ताफ्यासह सूरतमधील ली मेरिडियन या हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलमधूनच भाजपच्या नेत्यांच्या ते संपर्कात आहेत. तसेच शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं तसंच फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं तर मला उपमुख्यमंत्री करावं, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीसोबत असलेली शिवसेना चांगलीच कात्रीत सापडली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना मध्यस्थी करण्यासाठी सूरतला पाठवले आहे. उद्धव ठाकरेंकडून ही मनधरणी सुरु असतानाच एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मंत्रीपदाचा राजीनामा देणार ,अशी माहिती पुढे आली आहे.

गटनेतेपदावरून हटवलं

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना नेतृत्वानेही मोठा निर्णय घेता आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्याऐवजी अजय चौधरी यांना हे पद देण्यात आलं आहे. शिवसेनेनं घेतलेला हा निर्णय पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागू शकतो.

एकनाथ शिंदेंना गांधीनगरला बोलावलं

दरम्यान, महाराष्ट्रातील अस्थिर झालेल्या सरकारला पाडण्यासाठी भाजपातील राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वानंही जोर लावला आहे. भाजप नेते अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या आमदारांच्या ताफ्यासह गांधीनगर येथे बोलावलं आहे. त्यांच्यासाठी 3 चार्टर विमानं आणि 14 फॉर्चुनर गाड्यांचा ताफा तैनात ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी भाजपनं आखलेली रणनिती यशस्वी होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.